मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यातील मैत्रीचे बरेच किस्से जगजाहीर आहेत. त्यांची मैत्री राजकारणापलीकडची असल्याचं नेहमीच बोललं जातं. आणि या नेत्यांनी वेळोवेळी याचे दाखले सुद्धा दिलेत. पुण्यात एका कार्यक्रमावेळी त्यांनी सुशील कुमार शिंदेच्या मैत्रीचा हा किस्सा सांगितला होता. तर सुशील कुमार शिंदे हे पोलिस उपनिरीक्षक बनले होते. मुंबईत सीआयडी ऑफिसर म्हणून काम करत होते.
याच काळात शरद पवार आणि शिंदे यांच्यात मैत्री वाढली. दोघे तसे समवयस्क. सुशीलकुमार शिंदेंनीही पवारांना विद्यार्थीदशेपासून पाहिलं होतं. शरद पवार हे जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे मानस पुत्र मानले जायचे. त्यांच्या आग्रहामुळे सुशीलकुमार शिंदे नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात आले. यशवंतराव चव्हाण यांना त्यांनी आपला नेता मानलं होतं.१९७२ साली पवारांच्या आग्रहामुळे सुशील कुमार शिंदेंना करमाळ्यातून आमदारकीचं तिकीट मिळालं. पण पुढे काही कारणास्तव शिंदेंचं नाव वगळून तायाप्पा सोनवणे यांना आमदारकीचं तिकीट मिळालं. इकडे सुशीलकुमार शिंदे मात्र द्विधा मनस्थितीत सापडले. कारण त्यांनी चांगल्या पगाराची सीआयडीची नोकरी या राजकारणापायी सोडली होती. आता तर आमदारकीचं तिकीट पण गेलं.
शरद पवारांच्या सांगण्यावरून सुशीलकुमार शिंदे यांनी पोलिस खात्याची नोकरी सोडली होती. पोटनिवडणुकीत आमदारकीचं तिकीट मिळेल, असं आश्वासन पवारांनी त्यांना दिलं होतं. पण त्यांना तिकीट मिळालं नाही, म्हणून शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू तरळले. हा किस्सा स्वतः शरद पवारांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात सांगितला होता.पवारांनी पुढे सांगितलं की, "मी त्या सरकारमध्ये गृहमंत्री झालो होतो. शिंदे हे कायद्याचे पदवीधर असल्याने मी त्यांना सरकारी वकील केलं. आमच्याकडे जी काही प्रकरणे आली, ती आम्ही शिंदे यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला.पण नंतर तायाप्पा सोनवणे यांच्या निधनानंतर रिकाम्या झालेल्या आमदारकीच्या जागेवर पोटनिवडणूक लागली. आणि सुशीलकुमार शिंदे यांना त्या जागेवरून तिकीट मिळालं. एवढंच नाही तर खुद्द मुख्यमंत्री वसंतराव नाईक त्यांच्या प्रचारासाठी करमाळ्याला आले. या तरुणाला निवडून द्या मी त्याला मंत्री करतो असं आश्वासनही करमाळ्याच्या जनतेला दिलं. आणि सुशीलकुमार शिंदे पहिल्याच फटक्यात मंत्री झाले.