कोल्हापूर: राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. आता धक्कादायक निकाल हाती येऊ लागले आहेत.कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या पुलाची शिरोलीत सत्तांतर झालंय. सतेज पाटील गटाकडून महाडिक गटानं सत्ता खेचताना तब्बल 18 जागांपैकी 17 जागा मिळवल्या आहेत.
सरपंचपदासाठी पद्मजा कृष्णात करपे या 4 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्या. शिरोली ग्रामपंचायतीसाठी सत्ताधारी शाहू स्वाभिमानी आघाडी आणि विरोधी महाडिक आघाडी अशी थेट दुरंगी लढत होत आहे. सरपंचपदासाठी शाहू आघाडीकडून माजी ग्रामपंचायत सदस्य रूपाली खवरे, तर महाडिक आघाडीकडून पद्मजा करपे रिंगणात होत्या. यामुळं पुन्हा एकदा खवरे-करपे यांच्यात तुल्यबळ सामना झाला.
ग्रामपंचायतमधील सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी महाडिक आघाडीनं प्रतिष्ठा पणाला लावली होती. शिरोली ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक व ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांचं हे होम ग्राऊंड आहे.