"मुंबई कोणाच्या बापाची..." कर्नाटक मंत्र्यावर फडणवीस संतापले

नागपूर:  नागपूरमधील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राने कर्नाटकविरोधात ठराव एकमताने मंजूर केला. दरम्यान, कर्नाटकच्या काही मंत्र्यांनी मुंबईत २० टक्के कन्नड भाषिक, मुंबईला केंद्रशासित करा अशी मागणी केली. या मागणी वर भाष्य करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाट मंत्र्यांचा चांगला समाचार घेतला.मुंबईत २० टक्के कन्नडभाषिक राहतात असा जावईशोध लावला असल्याची माहिती अजित पवार यांनी विधानसभेत दिली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महाराष्ट्राची असून, कोणाच्याही बापाची नसल्याचं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे.



काय म्हणाले फडणवीस?

मुंबईवर दावा सांगणं खपवून घेतलं जाणार नाही. त्याबद्दल आम्ही निषेध करतो. विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे तशा प्रकारचं निषेधाचं पत्र आम्ही त्यांना पाठवू. गृहमंत्र्यांसमोर जे ठरलं आहे त्याचं उल्लंघन करणं दोन राज्यांमधील संबंधांसाठी योग्य नाही. हे त्यांना अतिशय कडक शब्दांत सांगण्यात येईल. तसंच तुमच्यासमोर जे ठरलं होतं त्याचं कर्नाटक पालन करत नसल्याचं गृहमंत्र्यांच्याही निदर्शनास आणून दिलं जाईल.केंद्रीय गृहमंत्र्यांनीही कर्नाटकच्या अशा बोलघेवड्या लोकांना तंबी दिली पाहिजे अशी विनंतीही करण्यात येईल. मी पुन्हा सांगतो की, मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही. त्यावरचा कोणाचाही दावा खपवून घेतला जाणार नाही. असं फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं.सरकार नव्हे तर सभागृह म्हणून निषेध असून या सभागृहाच्या भावना कर्नाटक सरकार, केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या जातील अशी माहितीही त्यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने