मोरबी दुर्घटनेत नदीत उडी मारून वाचवले अनेकांचे प्राण; 'या' नेत्याला जनतेनं दिला आशीर्वाद!

गुजरात: गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा पार केला असून हळूहळू इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. राज्यात काँग्रेसला  मोठा झटका बसला आहे, तर आम आदमी पक्षाला 10 टक्क्यांहून अधिक मतं मिळताना दिसत आहेत.सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपचे सर्व दिग्गज नेते आघाडीवर असल्याचं दिसत आहे. तर, दुसरीकडं मोरबी दुर्घटनेत अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या भाजप उमेदवाराला जनतेनंही आशीर्वाद दिले आहेत. वास्तविक, मोरबी येथील भाजपचे उमेदवार कांतीलाल अमृतिया दहा हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.



ऑक्टोबर महिन्यात मच्छू नदीवरील पूल कोसळला  होता. या अपघातात 130 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातानंतर लगेचच कांतीलाल अमृतिया यांनी नदीत उडी मारून अनेकांचे प्राण वाचवले. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओही समोर आले होते. यामध्ये ते लाईफ ट्यूब घालून जीव वाचवताना दिसत होते.प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, पूल कोसळल्यानंतर लगेचच अमृतिया यांनी नदीत उडी मारून अनेकांना वाचवलं होतं. यानंतर पक्षानं त्यांच्यावर विश्वास दाखवत मोरबीतून तिकीट दिलं. आज सकाळी 10.30 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, मोरबी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कांतीलाल अमृतिया 10,156 मतांनी आघाडीवर आहेत. त्याचवेळी भाजप 150 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस केवळ 16 जागांवर आघाडीवर आहे, तर आप सहा जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय, दोन जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत.

मोरबी दुर्घटनेनंतर भाजप सरकारवर ताशेरे ओढण्यात आले होते. 130 हून अधिक मृत्यूंचा समावेश असलेल्या या मोठ्या निष्काळजीपणाबाबत अनेक गोष्टी आता समोर आल्या आहेत. या पुलाची क्षमता 100-150 लोकांची असल्याचं सांगण्यात येत होतं. अपघाताच्या दिवशी या पुलावर क्षमतेपेक्षा 5 पट अधिक लोक प्रवास करत होते. यानंतर पूल तुटून अनेकांना जीव गमवावा लागला. गुजरात सरकारनंही अपघातातील मृतांना भरपाई जाहीर केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने