देशात लवकरच नवी टोल सिस्टीम? कॅमेरांमुळे वाचणार प्रवासाचा वेळ; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : केंद्र सरकार लवकरच नवीन टोल सिस्टिम आणणार आहे. सध्या फास्टटॅगवरून टोल जमा करण्याच्या सिस्टिमचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये लवकरच बदल करण्यात येत असुन एका नवी सिस्टिम अंमलात आणण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडुन कॅमेरावर आधारित टोल जमा करण्याच्या पद्धतीचा विचार सुरू आहे. या कॅमेऱ्यांना ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर’ (ANPR) म्हणून ओळखले जाईल.कॅमेऱ्यावर आधारित या टोल जमा करण्याच्या पद्धतीचे मुख्य कारण नागरिकांचा टोल प्लाझावरील वेळ वाचवणे हा आहे. सध्या भारतातील ९७ टक्के टोल प्लाझावर फास्टटॅगचा वापर केला जातो. पण तरीही नागरिकांना या टोल प्लाझावर होणाऱ्या गर्दीला सामोरे जावे लागते. टोल प्लाझावर एएनपीआर सेट केल्याने कदाचित ही गर्दी जमा होणार नाही आणि नागरिकांचा वेळ वाचेल अशी शक्यता सरकारने व्यक्त केली आहे.



एएनपीआर कसे काम करेल?
देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गावरून टोल प्लाझा हटवण्यात येतील आणि त्याजागी एएनपीआर इन्स्टॉल केले जाईल. एएनपीआरद्वारे गाडीच्या नंबर प्लेटवरील नंबरची नोंद करण्यात येईल आणि त्या व्यक्तीच्या बँक अकाउंटमधून पैसे भरले जातील.

एएनपीआर सिस्टिममध्ये कोणत्या अडचणी येऊ शकतात?
एएनपीआर सिस्टिममध्ये अनेक संभाव्य अडचणी येऊ शकतात. सर्वात मोठी अडचण म्हणजे या कॅमेऱ्यांमध्ये केवळ २०१९ नंतर बनवण्यात आलेल्या गाड्यांचेच नंबर कॅप्चर केले जातील. याचे कारण म्हणजे,२०१९ मध्ये सरकारने ओइएम असणारे नंबर प्लेट्स असावे अशी कल्पना मांडली आणि त्यानुसार नंबर प्लेट्स बनवण्यात आल्या. त्यामुळे त्या आधीच्या गाड्यांच्या नंबर प्लेट्सची नोंद होणार नाही.‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर’मधील आणखी एक समस्या म्हणजे या कॅमेऱ्याद्वारे ९ अंकांपेक्षा अधिक अंक किंवा अक्षर असणाऱ्या गाडयांवरील नंबर कॅप्चर करता येणार नाही. बऱ्याच जणांनी एखादे नाव किंवा एखादे लकी अक्षर नंबर प्लेटमध्ये जोडलेले असते. त्यामुळे अशा नंबर प्लेटवरील नंबर एएनपीआर सिस्टिमला कॅप्चर करता येणार नाहीत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने