मुंबई : संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. कामकाजाच्या दृष्टीनं हे अधिवेशन केवळ 17 दिवसांचं असलं, तरी मंगळवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेससह विरोधी पक्षांनी ज्या प्रकारची वृत्ती दाखवली, त्यावरून हे अधिवेशन चांगलंच तापण्याची शक्यता आहे.काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी एका दिवसात निवडणूक आयुक्तांची नियुक्ती, चीन सीमेवरील तणाव, महागाई, EWS आरक्षणाचा फेरआढावा या विषयांवर सरकारशी चर्चेची मागणी केली आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होऊन 29 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यादरम्यान दोन्ही सभागृहांच्या एकूण 17 बैठका होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात पोहोचले आहेत. यावेळी माध्यमांना संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आणि आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पुढं वाटचाल करत आहोत.पीएम मोदी पुढं म्हणाले, ज्या प्रकारे भारतानं जागतिक समुदायात आपलं स्थान निर्माण केलं आहे, त्या प्रकारे भारताकडून अपेक्षा वाढल्या आहेत. भारत जागतिक स्तरावर आपला सहभाग वाढवत आहे, त्यामुळं भारताला जी-20 अध्यक्षपद मिळणं खूप महत्त्वाचं आहे.