महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी मिळाली नसल्याने संजय राऊत संतापले; म्हणाले “देशात अधिकृतपणे हुकूमशाहीची…”

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेली अवमानकारक वक्तव्ये, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून होत असलेली चिथावणीखोर वक्तव्ये आणि महाराष्ट्रातील वाहनांवर तेथे होत असलेले हल्ले, महाराष्ट्रातून अन्य राज्यात पळविले जाणारे प्रकल्प यांसह अनेक मुद्दय़ांवर मुंबईत महाविकास आघाडीतर्फे १७ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. पण अद्याप या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.



“या देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाहीची घोषणा झालेली नाही. लोकशाहीत लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नाही. राहुल गांधींची भारत जोडो यात्राही एकाप्रकारे मोर्चा आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.“महाराष्ट्रातील विषय फार गंभीर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासारख्या दैवतांचा जो अपमान घटनाकत्मक पदावर बसलेला व्यक्ती खुलेआम करतात आणि त्याचं समर्थन सरकार करत आहे. याविरोधात मोर्चा काढू नये का?,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे.

“मोर्चा काढू नये असं वाटत होतं तर राज्यपालांना हटवायला हवं होतं. छत्रपतींचा अपमान कऱणाऱ्या तुमच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांवर कारवाई करायला हवी होती. केली नसल्याने आम्ही मोर्चा काढणारच,” असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.“कर्नाटकचे आणि राज्याचे मुख्यमंत्री भेटले असले तरी सीमाभागात तणाव आहे. आम्ही फार टोकाची भूमिका घेणार नाही. पण तोही मुद्दा लोकासोर येणं गरजेचं आहे. अशा अनेक मुद्द्यावंर आम्ही मोर्चा काढू. आम्ही महाराष्ट्राचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवू. हा जनतेचा मोर्चा असून, जनता या मोर्चात उतरेल. आम्ही फक्त या मोर्चाचं नेतृत्व करत आहोत. आमच्या या मोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही,” असंही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने