कर्नाटकात बोम्मईंपेक्षा येदियुरप्पांवरच भाजपचा भरवसा !

 नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकी दरम्यान माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याशी काल रात्री उशीरा १५ मिनिटे एकांतात चर्चा केली. मोदी-शहा यांनी येडियुरप्पा यांचे उत्तराधिकारी म्हणून निश्चित केलेले मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे अमर्याद भ्रष्टाचार व अन्य कारणांमुळे जबरदस्त टीकेचे धनी ठरत आहेत. त्यामुळे भाजप नेतृत्वाला कर्नाटकातील प्रस्तावित ‘मिशन १३६‘ साध्य करण्यासाठी जुनेजाणते येडियुरप्पा यांचेच सहाय्य बोम्मई यांच्याइतके किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त महत्वाचे वाटते हा ‘मेसेज' दोन्ही नेत्यांच्या भेटीतून मिळाला आहे.

यंदाच्या वर्षी ज्या ९ राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यापैकी कर्नाटक हे भाजपच्या दृष्टीने महत्वाचे आहे. तेलंगणा जोवर जिंकत नाही तोवर भाजपला दक्षिणेत दाखविण्यासाठी पाचपैकी हे एकमेव राज्य आहे. दिल्लीत सुरू असलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा मुख्य अजेंडा या नऊ राज्यांसाठी निवडणूक रणनीती आखणे हा आहे.भाजपने अलीकडेच येडियुरप्पा यांचा पक्षाच्या संसदीय मंडळात समावेश केला आहे. येत्या तीन-चार महिन्यांत कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका होणार असून भाजपसमोर बालेकिल्ला वाचवण्याचे प्रचंड मोठे आव्हान आहे. त्यासाठी भाजप नेतृत्वाला बोम्मई नव्हे तर कर्नाटकचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले व २०१९ नंतर राज्यातून बाजूला केलेले



येदियुरप्पा यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसते. मोदी यांनी सर्वश्री लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन आदींसाठी पंचाहत्तरीनंतर सक्तीची निवृत्ती, हा निकष लावला. मात्र ८० पार येदियुरप्पा यांच्याबाबत तोही शिथिल केला गेला यातच त्यांचे राज्यातील महत्व लक्षात येते.लिंगायत समाजावरील येदियुरप्पा यांची पकड अजूनही तेवढीच मजबूत असल्याचे भाजप नेतृत्वाला वाटते.त्यामुळेच येदियुरप्पा यांना मोदींनी वेळात वेळ काढून भेट दिली व बोम्मई आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांना राज्याचे प्रभारी सरचिटणीस अरुण सिंह यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले गेले. येथेच संदेश आणखी स्पष्ट जाल्याचे मानले जाते.बोम्मई यांच्यावर अमर्याद भ्रष्टाचाराचे आरोप विरोधकांनी केले आहेत. कॉंग्रेसने त्यांच्याविरूध्द सुरू केलेल्या ‘पे-सीएम' मोहीमेला राज्यातील जनतेकडूनही प्रतिसाद मिळत असल्याचे फीडबॅक दिल्लीत आल्यावर भाजप नेतृत्व बोम्मईंबाबत कमालीचे सावध झाले आहे.

आपल्यावरील आरोपांवरून कथितरीत्या लोकांचे लक्ष वळविण्यासाठी बोम्मई कधी महाराष्ट्राची तर कधी गोव्याची खोड काढतात व प्रत्येक वेळी गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीत दोन्ही राज्यांच्या नेत्यांच्या बैठका घ्याव्या लागतात हा घटनाक्रमही सर्वेसर्वा पक्षनेतृत्वाच्या लक्षात आल्याचे भाजप सूत्रांनी सागितले.शहा यांनी २२४ जागांच्या कर्नाटक विधानसभेत राज्य भाजपला "मिशन १३६" चे लक्ष्य दिले आहे. कर्नाटक हे अशा काही राज्यांपैकी एक आहे जिथे पक्षाला तळागाळात पाठिंबा मिळतो. काँग्रेस आणि एचडी कुमारस्वामी यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्या आमदारांबाबत आॅपरेशन कमळ यशस्वी केल्यावर ते सरकार कोसळल्याने कर्नाटकात भाजप तिसऱ्यांदा सत्तेवर आला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने