मुंबई: अभिनेत्री राखी सावंत हीच्या आईचं शनिवारी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. गेल्या तीन वर्षांपासून राखीची आई म्हणजेच जया भेडा यांना कर्करोगानं ग्रासलं होतं. पुढे त्यांना ब्रेन ट्यूमरचेही निदान झाले आणि प्रकृती अधिकच खालावली. अखेर त्यांना देवाज्ञा झाली.आईच्या निधनानंतर राखी पूर्णपणे खचली आहे. आपण पाहिले की राखीचे रडून रडून हाल झाले होते. शिवाय ती कायमच म्हणायची की या जगात आईशिवाय तिला कुणीही नाही. त्यामुळे तिची आई गेल्याने तिचा मोठा आधार निसटला आहे.म्हणून राखीने या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या जवळच्या मित्राला म्हणजेच किरण मानेला कॉल केला होता. यावेळी राखीशी झालेला संवाद ऐकून किरण माने यांनी एक भावुक पोस्ट केली आहे.बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात राखी सावंतने अक्षरशः हैदोस घातला. राखीचे तिच्या स्वभावामुळे कुणाशीच फार पटले नाही, पण तिचा एक खास दोस्त त्या घरात झाला तो म्हणजे किरण माने. किरण माने तिची मैत्री अवघ्या जगाने पाहिली. बिग बॉस च्या घरात जुळेलेली ही मैत्री घरा बाहेरही तशीच आहे. याच मैत्रीचं नातं किती घट्ट आहे ही सांगणारी एक पोस्ट किरण माने यांनी केली आहे.
माने यांनी लिहिले आहे की, ''माने, माझी आई गेली. माझा आधार गेला. मी पोरकी झाले...तुम्हाला माहित आहे माझी आई माझ्यासाठी सर्वस्व होती..मी काय करू आता???" ओक्साबोक्सी रडणार्या राखीचे एकेक शब्द माझ्या काळजात कालवाकालव करत होते...''''जवळचा मित्र म्हणून फोनवरुन सांत्वन करण्याव्यतिरिक्त मी काहीही करू शकत नव्हतो. खूप हताश झाल्यासारखं वाटलं. आपल्या मैत्रीणीवर दु:खाचा पहाड कोसळलाय आणि आपण तिच्यासाठी काहीच करू शकत नाही ही हतबलता मनाला घेरून टाकत होती...''''...'बिगबाॅस'च्या घरात विकास आणि तेजस्विनीनंतर माझी खर्या अर्थानं कुणाशी मैत्री झाली असेल तर ती राखी सावंतशी ! जे कारण विक्याशी मैत्री होण्याचं होतं तेच राखीशी... विपरीत परीस्थितीचा खडक भेदून उगवून येणारे अंकुर मनापासून भावतात...''