माझी आई गेली, मी पोरकी झाले.. किरण मानेनी सांगितलं, आईच्या निधनानंतर काय म्हणाली राखी..

मुंबई: अभिनेत्री राखी सावंत हीच्या आईचं शनिवारी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. गेल्या तीन वर्षांपासून राखीची आई म्हणजेच जया भेडा यांना कर्करोगानं ग्रासलं होतं. पुढे त्यांना ब्रेन ट्यूमरचेही निदान झाले आणि प्रकृती अधिकच खालावली. अखेर त्यांना देवाज्ञा झाली.आईच्या निधनानंतर राखी पूर्णपणे खचली आहे. आपण पाहिले की राखीचे रडून रडून हाल झाले होते. शिवाय ती कायमच म्हणायची की या जगात आईशिवाय तिला कुणीही नाही. त्यामुळे तिची आई गेल्याने तिचा मोठा आधार निसटला आहे.म्हणून राखीने या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या जवळच्या मित्राला म्हणजेच किरण मानेला कॉल केला होता. यावेळी राखीशी झालेला संवाद ऐकून किरण माने यांनी एक भावुक पोस्ट केली आहे.बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात राखी सावंतने अक्षरशः हैदोस घातला. राखीचे तिच्या स्वभावामुळे कुणाशीच फार पटले नाही, पण तिचा एक खास दोस्त त्या घरात झाला तो म्हणजे किरण माने. किरण माने तिची मैत्री अवघ्या जगाने पाहिली. बिग बॉस च्या घरात जुळेलेली ही मैत्री घरा बाहेरही तशीच आहे. याच मैत्रीचं नातं किती घट्ट आहे ही सांगणारी एक पोस्ट किरण माने यांनी केली आहे.



माने यांनी लिहिले आहे की, ''माने, माझी आई गेली. माझा आधार गेला. मी पोरकी झाले...तुम्हाला माहित आहे माझी आई माझ्यासाठी सर्वस्व होती..मी काय करू आता???" ओक्साबोक्सी रडणार्‍या राखीचे एकेक शब्द माझ्या काळजात कालवाकालव करत होते...''''जवळचा मित्र म्हणून फोनवरुन सांत्वन करण्याव्यतिरिक्त मी काहीही करू शकत नव्हतो. खूप हताश झाल्यासारखं वाटलं. आपल्या मैत्रीणीवर दु:खाचा पहाड कोसळलाय आणि आपण तिच्यासाठी काहीच करू शकत नाही ही हतबलता मनाला घेरून टाकत होती...''''...'बिगबाॅस'च्या घरात विकास आणि तेजस्विनीनंतर माझी खर्‍या अर्थानं कुणाशी मैत्री झाली असेल तर ती राखी सावंतशी ! जे कारण विक्याशी मैत्री होण्याचं होतं तेच राखीशी... विपरीत परीस्थितीचा खडक भेदून उगवून येणारे अंकुर मनापासून भावतात...''

''वरळीतल्या अतिशय गरीब घरात लहानाची मोठी झालेली एक मुलगी, वडिलांचा प्रचंड विरोध असूनही बाॅलीवूडमध्ये यायचं स्वप्न बघते. पोरीची जिद्द आई ओळखते. आपला सगळा सपोर्ट मुलीला देते. तिच्यासोबत घराबाहेर पडते आणि तिला सांगते, "लढ तू. मी आहे खंबीर तुझ्यासोबत."''...छोटं-मोठ्ठं कसं का असेना, पण राखीनं बाॅलीवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं. हे करताना ती एक विसरली नाही की आईचा आधार नसता तर आपण इथे नसतो. राखीनं शेवटपर्यन्त आईची मनापासून सेवा केली. शेवटच्या कॅन्सरच्या काळात तर आईला तिनं फुलासारखं जपलं.''''...राखी, तू बिगबाॅसमध्ये माझ्याशी अगदी निरपेक्ष,निर्भेळ, नितळ मैत्री केलीस. ती शेवटपर्यन्त जपलीस. आपण एकदा गप्पा मारत बसलोवतो. मी तुला एक शेर ऐकवला. "घर में धन, दौलत, हिरे, जवाहरात सब आए...''


''लेकिन जब घर में माॅं आयी, तब खुशियां आयी !" तू अचानक रडायला सुरूवात केलीस. आईच्या आठवणीनं व्याकूळ झाली होतीस तू. राखी, सगळ्यात मोठ्ठं, वेदनादायी दु:ख कुठलं असेल तर डोक्यावरून आईची सावली दूर होण्याचं.''''आम्ही किती आणि कसं सांत्वन करणार तुझं??? तुलाच खंबीरपणे यातून बाहेर पडावं लागेल. पण मला एक माहीतीय राखी, आईनंतर तुझ्या सगळ्यात जवळचं कोण असेल तर तो तुझा देव. तुझी आई त्या देवाजवळ गेलीय हे मनात ठेव. तिथे आता ती कायम 'महफ़ूज़' आहे !''''मी पाहीलंय, रोज डोळे मिटून मनापासून प्रार्थना करतेस तू. त्यावेळी आता तुला देवासोबत आईही दिसेल, भेटेल. तू तिच्याशी खूप बोलू शकशील. हसवू शकशील तिला. तुझ्या खुश रहाण्यातच तिचा आनंद आहे, हे लक्षात ठेव. आम्ही जिवलग मित्र आहोतच तुझ्यासोबत. लब्यू राखी.'' अशी भावूक पोस्ट माने यांनी केली आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने