“…हे जर व्हायला लागलं तर यातून महाराष्ट्रात उठाव होईल; आम्ही काय मूग गिळून बसलेलो नाही” अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा!

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर बलात्काराची केस दाखल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. यावर विरोधी पक्षेनते अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकारपरिषदेत बोलताना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सरकारला इशाराही दिला.अजित पवार म्हणाले, “एखाद्या व्यक्तीने जर कोणावर बलात्कार केला नाही आणि तरीही त्याच्यावर बलात्काराची केस दाखल करायची म्हणजे ही मोगलाईच लागली. असं दुनियेत कधी घडत नाही. हे जर व्हायला लागलं तर यातून महाराष्ट्रात उठाव होईल. महाराष्ट्र शांत किंवा गप्प बसणार नाही. लोकांनाही कळतं की कशा पद्धतीने गोवण्यात येतय, काय करण्यात येतय? इतक्या खालच्या पातळीवर राज्याचं राजकारण जर जाणार असेल आणि सरकारी यंत्रणा या गोष्टीचा वापर करणार असेल, तर आम्हालापण वेगवेगळ्या आयुधांचा वापर करता येईल, आम्हीपण त्या आयुधांचा वापर करू. आम्ही पण अशाप्रकारे जर अन्याय होत असेल, तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही काय मूग गिळून बसलेलो नाही.”



या अगोदर विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर होणाऱ्या विविध आरोपांना प्रत्युत्तर देताना व राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना अजित पवारांनी पत्रकारपरिषदेत सांगितलं की, “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुरुवातीपासून शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाणारी पार्टी आहे. पुरोगामी विचार हा नेहमीच शरद पवार यांनी जसं त्यांनी राजकीय जीवनाला सुरुवात केली तेव्हापासून, यशवंतराव चव्हाण किंवा अन्य महत्त्वाच्या व्यक्ती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. आमच्या पक्षात सर्व जाती-धर्माला न्याय मिळाला पाहिजे. संविधानाचा आदर केला पाहिजे. घटना, कायदा, नियामाने देश आणि राज्य चाललं पाहिजे. अशा मताची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. यामध्ये अठरा पगडजाती, बारा बलुतेदार असे सगळेच येतात. त्यामुळे विरोधक जो बावू करतात त्याला काडीचा अर्थ नाही.”

याचबरोबर, “आम्हीपण अनेक वर्षे राज्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे. ते काम करत असताना आपण सगळ्यांनी आणि अवघ्या महाराष्ट्रानेही पाहीलं आहे. नेहमीच शरद पवारांनी महाविकास आघाडीचं सरकार, आघाडीचं सरकार असेल किंवा शरद पवार केंद्रात काम करत असतील, ज्या ज्या वेळेस ज्या ज्या गोष्टी घडल्या त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अतिशय स्पष्टपणे जनतेच्या समोर ठेवण्याचं काम हे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत करण्यात येत आहे. आता यामुळेच कुठंतरी सत्ताधारी पक्षांच्या पोटात दुखत असेल, म्हणून ते गैरप्रचार करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्याच्याशी आमचा दुरान्वये संबंध नाही, आम्ही आमच्या भूमिकेनेच पुढे जाणार.” असंही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

…तर ही महाराष्ट्राची परंपरा नाही –

याशिवाय, “जनतेबाबत कुठल्याबाबतीत चुकीचं घडलेलं असेल, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु सत्ताधारी पक्षाचा उगीचच विरोधकांना त्रास देण्यासाठी जर कोणाला तरी गोवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तर तो कुणीही सहन करणार नाही. अशाचप्रकारे आमचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले गेले होते, त्यामुळे त्यांनी अतिशय त्रासून त्यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती. परंतु नंतर त्यांना शरद पवारांनी समजावून सांगितलं, मी, जयंत पाटील भेटायला गेलो व त्यातून मार्ग काढला. वास्तविक जर चुका असतील तर त्यावर कारवाई करायला दुमत असण्याचं कोणाचंच कारण नाही. पण मुद्दाम कुभाड रचून कोणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तर ही महाराष्ट्राची परंपरा नाही. ” असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

राजकीय विरोधक आहेत म्हणून त्यांना संपवण्याचा प्रयत्न कोणी करू पाहत असेल, तर… –

“आम्ही तर १९९९ ते २००४ आणि २०१९ ते २०२२ अशाप्रकारे साडेसतरा वर्षे सरकारमध्ये काम करत होतो. आमच्याही काळात समोर विरोधी पक्ष होता, त्यावेळी आम्ही अशाप्रकारचा प्रयत्न कदापि केलेला नाही. त्यामुळे या मार्गाने जाण्याचा जर कोणी प्रयत्न केला, तर जनता हे सगळं बारकाईने बघत असते आणि आम्ही हे सहन करणार नाही. जर जाणीवपूर्वक कोणाला अडकवण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न, आपले राजकीय विरोधक आहेत म्हणून त्यांना संपवण्याचा प्रयत्न हा जर कोणी करू पाहत असेल, तर हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हीही ते कदापि सहन करणार नाही.” अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने