‘मुलगी झाली हो’ मालिकेतून काढल्यानंतर नैराश्यात गेलेले किरण माने, खुलासा करत म्हणाले “मला आत्महत्या…”

मुंबई: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता किरण माने ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. तल्लख बुद्धीच्या जोरावर किरण मानेंनी ‘बिग बॉस’च्या खेळात डावपेच आखत टॉप ५मध्ये त्यांचं स्थान निश्चित केलं होतं. घरातील ते एक स्ट्राँग स्पर्धक होते. परंतु, ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वात त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.‘बिग बॉस’च्या घरातील त्यांच्या खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात येण्याआधी किरण माने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होते. परंतु, अचानक त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. त्यानंतरही ते अनेक दिवस चर्चेत होते. ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व संपल्यानंतर किरण मानेंनी ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. यामुलाखतीत त्यांनी ‘मुलगी झाली हो’ मालिकेबाबतही भाष्य केलं.



किरण मानेंना मुलाखतीत ‘मुलगी झाली हो’ मालिकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “’मुलगी झाली हो’ मालिकेतून बाहेर काढल्यानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. काही सहकलाकारांनी माझ्यावर आरोप केले होते. यामुळे माझं मानसिक संतुलन बिघडत होतं. यामुळे मी नैराश्यात गेलो होतो. माझ्यावर चुकीचे आरोप झाल्यामुळे मला कामही मिळत नव्हतं. एक वेळ अशी आली होती, जेव्हा माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. आत्महत्या करुन जीवन संपवून टाकावं असं मला वाटत होतं”.किरण मानेंनी ‘बिग बॉस मराठी’बाबतही भाष्य केलं. “मला बिग बॉस मराठी ४च्या संपूर्ण टीमचे आभार मानायचे आहेत. मला या शोची खूप गरज होती. कॅमेऱ्यासमोर येण्याची संधी मी शोधत होतो. ‘बिग बॉस’च्या टीमने मला ती संधी दिली”, असं ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने