गांधींच्या अस्थी 46 वर्ष कटकमधील SBIच्या लॉकरमधे होत्या, कारण...

दिल्ली: भारतासाठी झटले आणि अखेर भारताचे पिता म्हणून अजरामर झालेले मोहनदास करमचंग गांधी. आज या महान व्यक्तीची पुण्यतिथी. महात्मा गांधींच्या निधनानंतर सारा देश डोक्यावरून पित्याचं छत्र हरवलंय या दु:खात रडत होता. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी त्यांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं होतं. या अस्थी मिळवण्यासाठी त्यांच्या पणतूंना उपोषण करावे लागले होते.महात्मा गांधींच्या अस्थींचे विसर्जन 46 वर्षांनी गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी केलं. 1950 पासून त्यांच्या अस्थी एका लाकडी बॉक्समध्ये एसबीआयच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आल्या होत्या अशी बातमी 1996 मध्ये ओडीसातील काही वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाली. त्यानंतर राज्य सरकारवर टीका करण्यात आली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचलं. तत्कालिन सरन्यायाधीश अहमदी यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणावर सुनावणी झाली होती.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांकडून ओडिसातील माध्यमांना 90 च्या दशकात गांधीजींच्या अस्थी बँकेच्या लॉकरमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती समोर येताच यामागचं कारण आणि हे कोणी केलं याबद्दल लोकांना काहीच समजलं नाही. अनेकांनी या अस्थी महात्मा गांधींच्या नाही तर सुभाष चंद्र बोस यांच्या आहेत असंही म्हटलं.ही बातमी पसरताच गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी 1996 मध्ये ओडिसाचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि एसबीआयचे चेअरमन यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्यची मागणी केली होती. यावर एसबीआयने आम्ही लवकर चौकशी करू असं म्हटलं होतं. त्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी तुषार गांधीना लॉकरमध्ये असलेल्या अस्थी महात्मा गांधींच्याच असल्याची माहिती दिली होती. तसेच अस्थी असलेल्या बॉक्सवर अस्थीज ऑफ महात्मा गांधी असं लिहण्यात आलं आहे असं सांगितलं होतं.



स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी एक पत्रही तुषार गांधी यांना पाठवलं होतं. यामध्ये म्हटलं होतं की, 29 नोव्हेंबर 1950 रोजी ओडिसाच्या मुख्यमंत्र्याच्या सचिवांनी 18*20 (18 इंच बाय 20) इंच आकाराचा बॉक्स बँकेच्या लॉकरमध्ये ठेवला होता. याची पोचपावती बँकेनं दिली होती. तसेच बँकेनं हा बॉक्स जपून ठेवला आहे आणि तो पूर्ण सुरक्षित आहे.याची कल्पना ओडीसाच्या मुख्यमंत्र्यांनाही देण्यात आली होती. मात्र राज्य सरकारकडून याला प्रतिसाद मिळाला नाही.अखेर तत्कालिन मुख्यमंत्री जेबी पटनायक यांना तुषार गांधी यांनी पत्रव्यवहार करून अस्थी मिळाव्यात अशी विनंती केली होती. त्यानंतर जेव्हा तुषार गांधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी जेबी पटनायक यांनी ही अफवा असल्याचं सांगितलं होतं. तसेच 1950 मध्ये ओडिसाचे तत्कालिन मुख्यमंत्री नव कृष्ण चौधरी यांचा कोणीही सचिव नव्हता असं सांगितलं होतं.

अखेर निकाल लागला

शेवटी 23 मार्च 1996 मध्ये http://एसबीआयच्या जनरल मॅनेजरना पत्र लिहून राज्य सरकारने सांगितलं की, लॉकरमध्ये असलेल्या बॉक्सची जबाबदारी राज्य सरकारची नाही. त्यामध्ये महात्मा गांधींच्या अस्थी असल्याचं सांगितलं जात आहे. बँकेने त्या बॉक्सबाबतचा निर्णय स्वत: घ्यावा.

न्यायासाठी गांधींच्या पणतूंनी केले होते उपोषण

गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी उपोषणाचं अस्र उपसल्यानंतर राज्यसरकारने माघार घेतली होती. त्यावेळीच काही संघटनांनी हा मुद्दा उचलून धरला. शेवटी प्रकरण कोर्टात गेलं. राज्य सरकारने म्हटलं की, जर न्यायालयानं आदेश दिला तर गांधीजींच्या अस्थी आम्ही तुमच्याकडे सोपवू. न्यायालयाने बँकेच्या लॉकरमध्ये असलेल्या बॉक्सला तुषार गांधींकडे सोपवण्यात यावं असा निर्णय दिला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने