'गायीपासून धर्माची निर्मिती, गोहत्या थांबली तर पृथ्वीवरील सर्व प्रश्न सुटतील'

गांधीनगर : गुजरातमधील कोर्टाने गायीच्या अवैध वाहतूक आणि हत्येसंदर्भात एक महत्त्वाचं विधान केलं आहे. देशातील गोहत्या थांबली तर पृथ्वीवरील सर्व समस्या सुटतील असं मत तापी जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश समीर विनोदचंद्र न्यास यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रातील एका २२ वर्षीय तरूणाला अवैधरित्या गायीची वाहतूक केल्याच्या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने हे मत व्यक्त केलं आहे.दरम्यान, गायीचे महत्त्व सांगताना न्यायालयाने सांगितलं की, 'आपल्या धर्माची उत्पत्ती गायीपासून झालेली आहे. गायीच्या शेणापासून बनवलेल्या घराला एटोमिक रेडिएशनचा सुद्धा काही फरक पडत नाही. त्याचबरोबर गोमूत्राचा सुद्धा अनेक रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयोग होतो' असं मत न्यास यांनी व्यक्त केलं. पण त्यांच्या या दाव्याला त्यांनी कोणताही वैज्ञानिक आधार दिला नाही.



हा निकाल देताना कोर्टाने एका संस्कृत श्लोकाचा हवाला दिला आहे. वेदांची उत्पतीसुद्धा गायीच्या अस्तित्वामुळेच झाली असून जगातून गाय नष्ट झाली तर विश्वाचे अस्तित्व नष्ट होईल असं म्हणत गोहत्या आणि गायींची बेकायदेशीर वाहतूक ही सुसंस्कृत समाजासाठी लांछनास्पद गोष्ट असल्याचं मत कोर्टाने व्यक्त केलं आहे. आपल्या गुजराती भाषेतील 24 पानांच्या निकालात कोर्टाने हे निरीक्षणे नोंदवली आहेत.दरम्यान, जुलै 2020 मध्ये 16 हून अधिक गायी एका ट्रकमध्ये बेकायदेशीरपणे वाहून नेत असताना अटक करण्यात आलेल्या मोहम्मद आमीन आरिफ अंजुमच्या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने ही निरीक्षणे नोंदवली. त्यांना दोरीने बांधून अन्नपाण्याविना वाहून नेण्यात येत होते. त्यानंतर त्याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने आरोपीला ५ लाखांच्या दंडासहित जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने