आठवलेंची नाराजी उघड; शिंदे-फडणवीस सरकारविरोधात पहिल्यांदाच केलं भाष्य, काय म्हणाले मंत्री?

महाबळेश्वर : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुकांमध्ये आपल्याला भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेसोबत (शिंदे गट) राहायचे आहे. त्यांनी सुद्धा आपले नाव घेणे आवश्यक आहे. मात्र, भाजप व एकनाथ शिंदे यांच्याकडून रिपब्लिकन पक्षाचे नाव विशेष करून घेतले जात नाही. डावलले जात आहे, अशी खंत मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) एकदिवसीय अभ्यास शिबिरात ते बोलत होते. ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, सीमाताई रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, केंद्रीय महासचिव अविनाश महातेकर, सरचिटणीस गौतम सोनावणे, कार्याध्यक्ष बाबूराव कदम, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, कार्याध्यक्ष अशोक गायकवाड आदी प्रमुख उपस्थित होते.




आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले  म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आम्ही भाजप व शिंदे गटासोबत आहोत. वैचारिक मतभेद असले तरी आमचे मिशन सत्तेपर्यंत पोचण्याचे मिशन आहे. सत्तेच्या माध्यमातून अनेक लोक भेटतात. त्यांची कामे होतात. त्यामुळे सत्ता आवश्यक आहे. मात्र, आपण चळवळीचे काम थांबवता कामा नये, चळवळ जिवंत ठेवली पाहिजे. दलित व आदिवासींना खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण मिळाले पाहिजे, यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. महत्त्वाच्या मागण्या व प्रश्नांवर राष्टीय समितीमध्ये चर्चा करून दिशा ठरविण्याची गरज आहे.’’

अशोक गायकवाड यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. सरचिटणीस गौतम सोनावणे, प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनीही मनोगते व्यक्त केली. प्रा. अरुण खरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा परिचय देत ऐतिहासिक संदर्भ सांगितले. पहिल्या सत्रात ‘आजचे भारतीय राजकारण आणि आंबेडकरी विचारांचे पक्ष- दिशा आणि वाटचाल’ या विषयावर निपाणी येथील आंबेडकरवादी विचारवंत डॉ. अच्युत माने यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. अनिल सकपाळे, ॲड. दिलीप काकडे यांनी सहभाग घेतला. दुसऱ्या सत्रात ‘समग्र परिवर्तनासाठी दलित चळवळ’ या विषयावर औरंगाबादचे डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी विचार मांडले. तिसऱ्या सत्रात उपस्थित मान्यवर पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने