"प्रकाश आंबेडकरांनी जपून..." ; शरद पवारांवरील वक्तव्यावर ठाकरे गटाची स्पष्ट भूमिका

मुंबई : राज्यात शिवशक्ती आणि भिमशक्तीच्या युतीनंतर महाविकास आघाडीमध्ये धुसफूस दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना शरद पवार यांच्यावर निशाणा साधत 'शरद पवार हे भाजपसोबतच आहेत, तुम्हाला लवकरच कळेल', असा खळबळजनक गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यानंतर राजकारण चांगलेच पेटले आहे.राष्ट्रवादीचे नेते प्रकाश आंबेडकरांवर देखील टीका करत आहेत. दरम्यान यावर ठाकरे गटाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 



शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले "प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत चार दिवसांपूर्वी शिवसेनेची युती झाली. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्तपणे ही घोषणा केली. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याविषयी विधाने करणे हे आम्हाला अजिबात मान्य नाही."संजय राऊत म्हणाले, "शरद पवार हे महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते आहेत. ते भाजपचे आहेत असं म्हणणं त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील हा फार मोठा आरोप आहे. ते भाजपचे असते तर महाराष्ट्रात त्यांनी अडीच वर्षापूर्वी भाजपचे सरकार दुर ठेवून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार येऊ दिले नसते. त्यांनी प्रत्येकवेळी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला.

आज सुद्धा देशामध्ये विरोधी पक्षाच्या एकीचा विषय आपण करतो. तेव्हा शरद पवार यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. कारण सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याचे काम शरद पवार करु शकतात. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी जपून शब्द वापरावे, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची चर्चा झाली की यांना सोबत महाविकास आघाडीत काम करायचे आहे. त्यामुळे भूतकाळातील मतभेद दुर ठेवावे लागतील आणि आघाडी उभी करावी लागेल, असे संजय राऊत म्हणाले. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने