भारतावर दहशतवाद्यांचं मोठं संकट; प्रजासत्ताक दिनी अनेक शहरं उद्ध्वस्त करण्याचा कट, सुरक्षा यंत्रणांना सतर्क

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्ली, पंजाबसह देशातील अनेक शहरांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला  होण्याची दाट शक्यता आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था  आयएसआय आणि इस्लामिक स्टेट अल कायदाला हाताशी धरून हा कट घडवत आहे, असा इशारा आयबीनं दिला आहे.26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, पंजाब आणि देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आयएसआयनं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कार्यकर्त्यांची मदत घेतलीये. यासंदर्भात सुरक्षा यंत्रणांना एक गोपनीय अहवाल प्राप्त झाला आहे.



देशात होणाऱ्या G20 शिखर परिषदेच्या वेळी इस्लामिक स्टेट अल कायदाची सायबर शाखा सायबर स्पेसवर चांगलीच सक्रिय झालीये. ही शाखा शिखर परिषदेदरम्यान (G20 Summit) मोठे सायबर हल्ले करण्याच्या तयारीत आहे. आयएसआय आपल्या स्लीपर सेल आणि रोहिंग्यांचा वापर करू शकतं.26 जानेवारीच्या निमित्तानं दिल्ली आणि पंजाबमध्ये आरडीएक्स स्फोट होऊ शकतात. एवढंच नाही तर अल कायदाचे दहशतवादी लोन वुल्फ हल्ल्याच्या शोधात आहेत. प्लॅननुसार, जर 26 जानेवारीला दहशतवादी योजना अयशस्वी ठरली, तर G20 शिखर परिषदेत दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला करण्याची योजना आहे.

आयएसआय यावेळी दिल्ली आणि पंजाबला लक्ष्य करण्यासाठी रोहिंग्या, अन्सार उल बांगला आणि जमात उल मुजाहिदीन या दोन बांगलादेशी संघटनांचा वापर करू शकतं. तर, शीख दहशतवादी गट दिल्ली आणि पंजाबमध्ये मोठे दहशतवादी हल्ले करू शकतात, असंही सांगण्यात आलं आहे. सुरक्षा यंत्रणांनी दल खालसा आणि वारिस पंजाबवरही बारीक नजर ठेवण्यास सांगितलंय. या दोन्ही संघटना देशातील वातावरण बिघडवण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने