मुंबई: आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाची कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. 2021 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ टॉप चार मध्ये पण नव्हता. तर गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकात इंग्लंडने भारतीय संघाचा उपांत्य फेरीत 10 गडी राखून पराभव केला. अशा परिस्थितीत माजी विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांनी भारतीय संघाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.कपिल देव एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, 'विश्वचषक जिंकायचा असेल, तर प्रशिक्षक, निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाला कठोर निर्णय घ्यावे लागतील. वैयक्तिक स्वार्थ मागे ठेवून संघाचा विचार करावा लागतो. विराट कोहली किंवा रोहित शर्मा किंवा दोन-तीन खेळाडूंवर विश्वचषक जिंकण्यासाठी तुमचा विश्वास असेल, तर असे कधीही होऊ शकत नाही. तुम्हाला तुमच्या टीमवर विश्वास ठेवायला हवा.
पुढे बोलताना कपिल देव म्हणतात की, 'काही खेळाडू असे असतात जे तुमच्या संघाचे आधारस्तंभ बनतात. संघ त्याच्याभोवती फिरतो, परंतु आता आपल्या ते संपवून किमान 5-6 खेळाडू तयार करावे लागतील. म्हणूनच मी म्हणतो, तुम्ही विराट कोहली आणि रोहित शर्मावर अवलंबून राहू शकत नाही. आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणारे खेळाडू हवे आहेत. तरुणांनी पुढे येऊन 'ही आमची वेळ आहे' असे म्हणण्याची गरज आहे.आगामी एकदिवसीय विश्वचषकाबाबत बोलताना कपिल देव यांनी आपले आपले मत मांडताना म्हणाले की, 'सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट म्हणजे विश्वचषक भारतात होणार आहे. परिस्थिती आपल्यापेक्षा चांगली कोणालाच माहीत नाही. गेल्या 8-10 वर्षांपासून रोहित आणि विराट हे भारताचे दोन महत्त्वाचे क्रिकेटपटू आहेत. विराट आणि रोहितचा हा शेवटचा विश्वचषक असेल का, असा प्रश्न अनेकांनी विचारायला सुरुवात केली आहे. मला विश्वास आहे की ते खेळू शकतात पण त्यांना खूप मेहनत करावी लागेल. फिटनेस महत्त्वाची भूमिका बजावेल.