महाराष्ट्रातील 'या' दोन शहरांची नावं बदलताच ओवैसी संतापले; म्हणाले, इतिहासाशी छेडछाड..

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या वतीनंदोन शहरांची नावं बदलण्यात आली आहेत. यावरुन आता AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी  एकनाथ शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.आमचं क्षेत्र आमची जनता ठरवेल. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे नाही, असं ओवैसी म्हणाले. महाराष्ट्रातील शिंदे सरकारनं राज्यातील औरंगाबाद  आणि उस्मानाबाद  या दोन शहरांची नावं बदलण्याचा निर्णय घेतलाय. औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर  आणि उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव  करण्यात आलं आहे.

'इतिहासाशी छेडछाड करणं चुकीचं'

ओवैसी म्हणाले, 'सरकार फक्त ठिकाणं, उद्यानं आणि शहरांची नावं बदलत आहे. इतिहास चांगला असू शकतो, वाईट असू शकतो; पण इतिहास हा इतिहास असतो. त्याच्याशी छेडछाड करणं चुकीचं आहे. जगभरातील हेरिटेज वास्तू आपल्या औरंगाबादमध्ये आहेत. या निर्णयाचा प्रत्येक स्तरावर फरक पडेल, सर्व कागदपत्रं बदलावी लागतील.'



'आमचं क्षेत्र आमची जनता ठरवेल'

आम्ही नामांतराविरुध्द यापूर्वी मोर्चा काढला होता, लोकांनीही विरोध केला होता. आज सरकारकडं संख्याबळ आहे, ते लोकांना विश्वासात न घेता काहीही करत आहेत. ही हुकूमशाही आहे. आमचं क्षेत्र आमची जनता ठरवेल. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे नाही, असंही ओवैसी म्हणाले.

नामांतराला केंद्र सरकारची मान्यता

केंद्र सरकारनं औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर करण्याच्या प्रक्रियेला मान्यता दिलीये. नाव बदलाबाबत महाराष्ट्र सरकारच्या मागण्या केंद्र सरकारनं मंजूर केल्या आहेत, त्यामुळं आता औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव करण्यात आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने