संयुक्त महाराष्ट्र झाला तो साहित्य संमेलनातून आणि आज..

वर्धा: वर्धा येथे आजपासून ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. वाद आणि संमेलन हे समिकरण याही वर्षी सुरू आहे. यंदा साहित्य संमेलनात वेगळा विदर्भाच्या घोषणा दिल्या गेल्या. तर महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी एका मासिकात लिहीलं होतं की, मराठी भाषिकांच्या एकीकरणाचा आणि साहित्य संमेलनाचा थेट संबंध आहे.



संयुक्त महाराष्ट्र चळवळीची ऐतिहासिक पार्श्वभूमी

यशवंतराव चव्हाण आपल्या 'ऋणानुबंध' मध्ये लिहितात की 'मराठी भाषिकांच्या एकीकरणाची ओढ साहित्य संमेलनातून निर्माण झाली. १९०८ च्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात चिंतामणराव वैद्य यांनी एकीकरणाचा उल्लेख प्रथम केला.सन १९११ साली इंग्रज सरकारने बंगालची फाळणी रद्द केली. त्या संदर्भात भाषा व राष्ट्रीयत्व या शीर्षकाखाली 'केसरी'मध्ये न. चिं. केळकर यांनी लिहिले की, 'मराठी भाषा बोलांनी सर्व लोकसंख्या एका अमलाखाली असावी'.तसेच लोकमान्य टिळकानी १९१५ साली भाषावार प्रांतरचनेची मागणी केली होती. १९३८ च्या अखेरीस मुंबई येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनात मागणी झाली की, वऱ्हाडासह महाराष्ट्राचा एकभाषी प्रांत बनवावा आणि पुढे निजाम व पोर्तुगीज यांची सत्ता नष्ट झाल्यावर मराठवाडा आणि गोवा हे प्रदेश सामील करावेत.

सन १९३९ च्या नगर येथील साहित्य समेलनात ठराव पास झाला की, सर्व मराठी भाषा प्रदेशाचा मिळून एक प्रांत बनवावा आणि त्याला 'संयुक्त महाराष्ट्र' असे नाव द्यावे असा ठराव केला.सन १९४० मध्ये रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली 'संयुक्त महाराष्ट्र सभा ही संस्था स्थापन केली. पुढे १९४९ साली डॉ. केदार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली. यामध्ये सर्व मराठी भाषिकांचा एकच प्रांत करावा असे ठरले.ऑगस्ट १९४० रोजी श्री. रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महाविदर्भ सभेची स्थापना झाली. १२ जुलै १९४२ रोजी श्री. गं. त्र्यं. माडखोलकरांनी महात्मा गांधीजींशी संयुक्त महाराष्ट्राविषयी पत्रव्यवहार केली.

तेव्हा महात्मा गांधीजीनी संयुक्त महाराष्ट्राच्या कल्पनेस पाठिंबा व्यक्त केला होता. परंतु मुंबई महाराष्ट्रात करण्यास मात्र विरोध दाखविला. ३० व ३१ मे १९४३ साली मुंबई येथे मराठी पत्रकार परिषद ज. स. करंडिकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती.यामध्ये दोन ठराव मांडण्यात आले. यामध्ये १) स्वतंत्र व्दर्भ राज्याच्या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला (२) संयुक्त महाराष्ट्र सभेने मागणी केलेली संपूर्ण महाराष्ट्राच्या मागणीचा ठराव मान्य करण्यात आला.१९४६ च्या बेळगाव येथील साहित्य समेलन १२ मे १९४६ रोजी ग. त्र्यं. माडखेलकरांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन भरले होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र निर्मिती संदर्भात महत्वपूर्ण भूमिका मांडली. संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासातील ही फार महत्वाची घटना होय.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने