पत्राचाळप्रकरणी राऊतांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई: पत्राचाळ मनी लाँड्रिंग प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.संजय राऊत यांना दिलेल्या जामीन रद्द करावा यासाठी ईडीने याचिका दाखल केली होती. मात्र, या याचिकेवर सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने १८ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. कोर्टाचा हा निर्णय राऊतांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना पीएमएलए न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर 9 नोव्हेंबर रोजी राऊत तब्बल १०० दिवसांनी बाहेर आले.

पत्राचाळ घोटाळा नेमका काय आहे?

२००६ मध्ये जॉईंट व्हेंचरअंतर्गत गुरू आशिष बिल्डरने पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. २००८ मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली. पण, दहा वर्षानंतरही पुनर्विकास झाला नसल्याचे लक्षात आले. मूळ ६७८ रहिवाशांना वाऱ्यावर सोडून म्हाडाच्या घरांना देखील बिल्डरने चुना लावल्याची माहिती होती.या बिल्डरने म्हाडाला १ हजार ३४ कोटींचा चुना लावला होता. बिल्डरने विक्रीसाठी असलेले क्षेत्र सात त्रयस्थ विकाससकांना विकल्याचा आरोप या बिल्डरवर होता. ही गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचे संचालक राकेश वाधवान आहे.




राकेश वाधवानसोबत प्रविण राऊत यांचे संबंध -

राकेश वाधवान यांच्यासोबत संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांच्यासोबत संबंध होता. प्रविण राऊत यांनी राकेश वाधवानसोबत मिळून पत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा केला आहे, असा संशय ईडीला आहे. त्यामुळे ईडीकडून प्रविण राऊत यांना अटक करण्यात आली होती.काही दिवसांपूर्वी याचप्रकरणी संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांची सुटका झाली होती. आता २ फेब्रुवारी २०२२ ला परत त्यांना अटक करण्यात आली आहे. संजय राऊत आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या संपत्तीवर टाच आलीये. याच घोटाळ्यातील पैसा संपत्ती घेण्यासाठी वापरला होता, असा संशय ईडीला आहे.

प्रविण राऊत यांच्या खात्यातून संजय राऊतांच्या पत्नीच्या खात्यात पैसे -

प्रविण राऊत हे संजय राऊतांचे स्नेही आहेत. त्यांच्या खात्यातून संजय राऊतांच्या पत्नीच्या खात्यात ५५ लाख रुपये गेले होते. पण, हे पैसे १० वर्षानंतर परत करण्यात आले. हे पैसे कर्जाच्या स्वरुपात घेतले होते, असा दावा संजय राऊतांच्या पत्नीने केला होता.पण, संजय राऊतांचा देखील या घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय ईडीला होता. त्यामुळे ईडीने संजय राऊतांच्या कुटुंबीयांवर छापेमारी केली होती. याच घोटाळ्याप्रकरणी ईडीने आज संजय राऊतांची मालमत्ता जप्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने