नागपूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया याच्यातील कसोटी मालिकेची चाहते आतूरतेने वाट पाहत आहेत. ही मालिका 9 फेब्रुवारीला सुरूवात होत आहे. पहिला कसोटी सामना हा नागपूर येथे होत असून भारतीय संघ नागपुरात दाखल झाला आहे. भारतीय संघात नुकताच लग्न झालेला केएल राहुल आणि आध्यात्मिक दौऱ्यावर गेलेला विराट कोहली देखील परतला आहे.ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या बॉर्डर - गावसकर ट्रॉफीमधील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारीदरम्यान नागपूर येथे होत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या बंगळुरू येथे कॅम्प करत आहे. या कॅम्पमध्ये कांगारू भारतीय वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हा कॅम्प 6 फेब्रुवारीपर्यंत चालेल त्यानंतर ते नागपूरसाठी रवाना होतील.
भारताने 2020 - 21 मध्ये ऑस्ट्रेलियाचा 2 - 1 असा पराभव केल्याने बॉर्डर - गावसकर ट्रॉफीचा भारत चॅम्पियन आहे. या कसोटी मालिकेत दोन्ही संघ अतिशय चुरशीने खेळत असतात. त्यामुळे या कसोटी मालिकेकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष असते. याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पात्र होण्यासाठी देखील ही मालिका भारत आणि ऑस्ट्रेलियासाठी महत्वाची आहे. सध्या WTC रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर असून भारत दुसऱ्या स्थानावर आहे.
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया, बॉर्डर - गावसकर ट्रॉफी
पहिला सामना, 9 ते 13 फेब्रुवारी, नागपूर
दुसरा सामना, 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली
तिसरा सामना, 1 ते 5 मार्च, धर्मशाला
चौथा सामना, 9 ते 13 मार्च, अहमदाबाद