वारीशेंच्या हत्येचा कट रत्नागिरीत शिजला; संजय राऊत

रत्नागिरी : पत्रकार शशिकांत वारीशे मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे. हा खून थरकाप उडवणारा आहे. अशा प्रकारच्या हत्या झाल्यास हे बिहार आहे का, असे उदाहरण दिले जात होते. आता महाराष्ट्राचे नाव घेतात ही दुर्दैवी बाब आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय हत्यांची परंपरा आहे. ते लोण आता रत्नागिरी जिल्ह्यातही पोहोचले आहे, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली. वारीशेची हत्या हे राजकीय षडयंत्र आहे. त्याचा कट रत्नागिरीतील एका बंगल्यावर शिजला.त्यामागे अनेक बड्या नेत्यांची नावे घेतली जात आहेत, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

पत्रकार वारीशे यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधीपक्ष अंबादास दानवे आज रत्नागिरीत होते.शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले, तरुण पत्रकाराला मारण्यात आले ही धक्कादायक घटना आहे. महाराष्ट्राला आणि देशाला ज्या जिल्ह्याने लोकमान्य टिळक, बाळशास्त्री जांभेकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. भूमिका पटत नाही तर एखाद्याला चिरडून मारले जाते हे बिहार आहे का?एकीकडे हे प्रकरण घडले असताना उपमुख्यमंत्री सिंधुदुर्गात येऊन रिफायनरी प्रकल्प होणारच अशी घोषणा करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय हत्यांची परंपरा आहे. श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, रमेश गोवेकर यांच्या राजकीय हत्या झाल्या.


ते लोण आता रत्नागिरीत आल्याचे दिसत आहे. ही एकच साखळी आहे. तपासासाठी जी टीम नेमली आहे त्यातील अधिकारी कोणाचे आहेत. यंत्रणा निःपक्ष आहे का? संशयिताचे कोणाशी लागेबांधे आहेत याचा तपास व्हावा, अशी मागणी करून राऊत म्हणाले, हा अपघात झाला तेव्हा तिन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही बंद होते. हा योगायोग आहे का?पंपावरील आठ कर्मचाऱ्यांचा जबाब घेऊ नये म्हणून दबाव आणला जातो. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणतात हा प्लॅन करून खून केला मग प्लॅनमध्ये कोण आहेत? त्यांच्यापर्यंत यंत्रणा का नाही पोहोचली? रिफायनरी प्रकल्पासाठी अनेकांचे बेनामी व्यवहार आहेत.वारीशेच्या आईचा आणि मुलाचा आक्रोश शासनाने ऐकला नाही. त्याला शासनाने 50 लाख रुपये मदत दिली पाहिजे. प्रकल्प लोकांनी स्वीकारला तर आम्हाला मान्य, असे स्पष्ट मत राऊत यांनी व्यक्त केले.या वेळी आमदार राजन साळवी, संपर्कप्रमुख मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी आदी उपस्थित होते.

पुढचा रत्नागिरीचा आमदार सेनेचाच
सत्ता संघर्षाबाबत आमच्या वकिलाने न्यायालयात भक्कम बाजू मांडली आहे. खरी सेना काय आहे हे लोकं ठरवतील. त्यासाठी निवडणुका होऊन जाऊदेत. 2024 देश आणि राज्यात परिवर्तन होणारच.जे कोणी हौशेनौशे गेले त्याने सेनेला काही फरक पडत नाही. त्यांचे परतीचे मार्ग आता कायमचे बंद झाले आहेत. पुढच्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीचा आमदार सेनेचाच असेल, असा दावा राऊत यांनी केला.


मला तुरुंगात मारण्याचा प्रयत्न
खोट्या गुन्ह्याखाली आपल्यालाही तुरुंगात पाठवण्यात आले आणि तेथे आपल्याला मारण्याचा प्रयत्न झाला. योग्य वेळ आल्यानंतर यावर विस्तृत बोलेने, असे सांगत त्यांनी देशात, राज्यात आणीबाणीपेक्षाही भयंकर स्थिती असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने