मुंबई: केंद्रीय अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत मांडला. या अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. राज्य सरकारनंही या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे. हा अर्थसंकल्प मध्यमवर्गीच्या इच्छापूर्तीचा अर्थसंकल्प आहे, असं राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे मी आभार मानतो. कारण त्यांनी नुकताच सादर केलेला अर्थसंकल्प हा अमृतकाळातील सर्वजणहिताय असा अर्थसंकल्प आहे.
या अर्थसंकल्पात जे लोक विकासात मागे आहेत, आपले तरुण आहेत, शेतकरी, छोटे उद्योग, मध्यमवर्गीय या सर्वांना लक्षात घेता या अर्थसंकल्पाची रचना करण्यात आली आहे.विशेष म्हणजे पायाभूत सुविधांमध्ये १० लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर रेल्वेमध्ये सुमारे २ लाख ३० कोटींची गुंतवणूक होणार आहे. जर याची तुला २०१३-१४च्या अर्थसंकल्पाशी केली तर त्यामध्ये ९ टक्के जास्त गुंतवणूक जाहीर करण्यात आली आहे. पुढच्या पंचवीस वर्षात जो विकसीत भारत आपल्याला बनवायचा आहे, त्याकडं जाण्याचा मार्ग या अर्थसंकल्पानं स्पष्टपणे दाखवला आहे.