मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणावेळी गोंधळ, 'वेगळा विदर्भ'च्या जोरदार घोषणा

वर्धा: वर्धा इथं आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज पहिला दिवस होता. मात्र हा पहिलाच दिवस विदर्भवाद्यांनी घातलेल्या गोंधळामुळे चर्चेत आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी हा गोंधळ झाला.मराठी साहित्य संमेलनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. या संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यानंतर त्यांचं भाषण सुरू असतानाच विदर्भवाद्यांनी वेगळा विदर्भच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभामंडपात गोंधळ निर्माण झाला. या आंदोलकांची दखल मुख्यमंत्री शिंदेंनीही आपल्या भाषणात घेतली.



एकनाथ शिंदे म्हणाले, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ. हे साहित्य संमेलन आहे. आपले विषय मांडायला वेगवेगळे व्यासपीठ आहे. या मान्यवरांचे स्वागत आपण केले पाहिजे. सरकारची दारे २४ तास उघडी आहेत. कुणाचाही अनादर करण्याचा आमचा हेतू नाही. आज हे साहित्यिकांचे राज्य आहे, कृपया तुम्ही गोंधळ घालू नये.गोंधळ करणाऱ्या या आंदोलकांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी लावून धरली. विदर्भावर उर्जा, पाणी, निधी प्रत्येक गोष्टीत अन्याय होत आहे, असं आंदोलकांचं म्हणणं होतं. दरम्यान, गोंधळ घालणाऱ्या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने