तिथं साखर कारखाना काढायचा धाडसी निर्णय 'त्यांनी' घेतला; असं कोणाबद्दल बोलले शरद पवार?

मुंबई: ग्रामीण महाराष्ट्रासाठी ही परिषद अत्यंत महत्वाची आहे. यामध्ये साखर कारखानदारी आणि सहकार यांच्या प्रश्नांची चर्चा होणार आहे. या महापरिषदेला देशाचे सहकार मंत्री येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांनी दिली.ते बँकींग व साखर उद्योगासाठी आयोजित सहकार महापरिषदेत बोलत होते. पवार म्हणाले, 'देशाच्या सहकार क्षेत्राची सूत्रं त्यांनी हाती घेतल्यानंतर, मी स्वतः त्यांना भेटायला गेलो आणि सत्कार करून महाराष्ट्राच्या प्रश्नांची मांडणी केली. सांगायला आनंद होतोय की, त्यांनी बहुतेक प्रश्नांची सोडवणूक केलीये. त्यामुळं या परिषदेत जे प्रश्न मांडले जातील, त्यासाठी अनुकूल प्रश्न असतील याची मला खात्री आहे.'



यूपीत मी बंद पडलेले कारखाने बघायला गेलो होतो. तिथं ऊस पीक घ्यायला सुरुवात झाली होती. या उद्योगाला १९३२ साली सुरुवात झाली. इथं कारखाने काढायला प्रोत्साहन मिळायला लागलं. वालचंद हिराचंद हे कापडाचे व्यापारी. त्यांची इच्छा होती की साखर धंद्यामध्ये जावं. आज ज्याला वालचंदनगर म्हणतात तिथं कळंब नावाचं गाव होतं. तिथं साखर कारखाना काढायचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला, असं पवार म्हणाले.महाराष्ट्रात साखर कारखानदारीची मुहूर्तमेढ खासगी लोकांनी रोवली. एका नव्या क्षेत्राची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. नगर जिल्ह्यात झाल्यावर हे लोण इतरत्र पोहोचलं. अशी ही कारखानदारी उभी राहिली. खासगी कारखानदारीपेक्षा सहकारी कारखानदारी उभी करावी, अशी भूमिका स्वीकारली गेली. 

कामगारांची कमतरता भासायला लागली, तेव्हा डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट ही संस्था काढली. वसंतदादा यांनी ही जबाबदारी घेतली. त्यानंतर संस्थेचं माझाकडं नेतृत्व आलं, तेव्हा मी नाव बदलून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नाव दिलं, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.सहकारी साखर कारखान्यातून राज्य सहकारी संघ स्थापन केला, यामुळं एक मोठं व्यासपीठ मिळालं. आत्तापर्यंत देशात ऊस आणि साखर याच्यापुढं गेलो नाही, पण आता जायचं असेल तर सहकारी संस्थांनी लक्ष दिलं पाहिजे. महाराष्ट्रात हजार लाख टन ऊस गाळला जातो. सध्या २४७० मेगा व्हॅट विजेचे प्रकल्प सुरू आहेत. राज्य सरकारला मी विजेचे दर कमी करण्याबाबत सांगत आहे, असंही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने