कांगारू घाबरले! ऑस्ट्रेलियाचा चौथा खेळाडू भारत सोडून घरी

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया याच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिले दोन कसोटी सामने जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली. भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेत पहिल्या दोन्ही कसोटीत नांग्या टाकल्यानंतर कांगारू संघाचे एका पाठोपाठ एक दिग्गज खेळाडू संघ सोडून मायदेशी जात आहेत. आता ऑस्ट्रेलियाचा चौथा खेळाडू भारत सोडून घरी गेला आहे.वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी अ‍ॅश्टन अगर भारत दौऱ्यावरून मायदेशी परतत आहे. इंदूरमध्ये 1 मार्चपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या बॉर्डर-गावसकर कसोटीपूर्वी अगरच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात कोणाचाही समावेश करण्यात आलेला नाही.



याआधी संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स मायदेशी परतला. जोश हेझलवूड आणि डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे आधीच मायदेशी परतले आहेत. अगर पूर्णपणे तंदुरुस्त आहे, पण 2 मार्चला पुढील शेफील्ड शिल्ड सामना आणि 8 मार्चला 50 षटकांच्या मार्श कप फायनलमध्ये खेळण्यासाठी तो मायदेशी गेला आहे.मिशेल स्वेपसन आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता. पॅट कमिन्सही कौटुंबिक कारणांमुळे ऑस्ट्रेलियात गेला, मात्र तोही तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतात परतण्याची शक्यता आहे. तिसर्‍या कसोटीसाठी कॅमेरून ग्रीन तंदुरुस्त होण्याची खात्री असल्याने ऑस्ट्रेलियाने वॉर्नरच्या जागी अन्य फलंदाजाचा समावेश केलेला नाही.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अगरने शेवटची कसोटी सिडनी येथे खेळली होती. नॅथन लियॉनसह दुसरा फिरकीपटू म्हणून तो संघाचा भाग होता. मात्र त्याला भारतात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाने ऑफस्पिनर टॉड मर्फी आणि कुहनेमन यांना पदार्पण केले. ऑस्ट्रेलियन संघ नागपुरात दोन आणि दिल्लीत तीन फिरकी गोलंदाजांसह खेळला, पण अगर या दोन्ही सामन्यात संघाबाहेर राहिला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने