कोरोनानंतर भारतावर आता 'या' विषाणूचं संकट; हरियाणा, कर्नाटकात घेतला बळी

दिल्ली: कोरोनानंतर आता गेल्या दोन महिन्यांपासून दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक राज्यांमध्ये पसरलेला H3N2 विषाणू  आता जीवघेणा ठरत आहे.या विषाणूची लागण होऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, यापैकी एक केस हरियाणातील आहे, तर दुसरी केस दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील आहे. या विषाणूच्या संसर्गामध्ये ताप, सर्दी, घसा खवखवणं आणि डोळ्यात जळजळ होणं अशी लक्षणं आढळतात.



एवढंच नाही तर संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याचा इतर लोकांवरही परिणाम होऊ शकतो. कर्नाटकातील हसन जिल्ह्यात या विषाणूमुळं एका 82 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मार्चला वृद्धाचा मृत्यू झाला. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वृद्धाला ताप, घसादुखी, अंगदुखी अशा समस्या होत्या. आजारपणामुळं त्यांना 24 फेब्रुवारीला हसन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, तिथं त्यांचं 1 मार्चला निधन झालं.H3N2 विषाणूमुळं वृद्ध व्यक्तीचा मृत्यू 6 मार्चला झाला होता. वृद्धाच्या संपर्कात कोण आलं हे पाहण्यासाठी सध्या प्रशासनाकडून पाळत ठेवण्यात येत असल्याचं हसनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं.

आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत H3N2 विषाणूचे 90 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय, H1N1 विषाणूचे 8 रुग्ण आढळले आहेत. बदलत्या हवामानामुळं देशातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक बळी पडत आहेत. यातील अनेकांना H3N2 विषाणूची लागण झाल्याचाही संशय आहे. या विषाणूला हाँगकाँग फ्लू असंही म्हणतात. याची लागण झालेल्या लोकांना ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास आणि अस्वस्थता यासारखी लक्षणं आढळतात. इतकंच नाही तर घसा खवखवणं, थकवा येणं, अंगदुखी, जुलाब अशा समस्याही आढळून येत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने