दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी परदेशात केलेल्या वक्तव्यामुळं अडचणीत सापडले आहेत. भाजपनं संसदेत राहुल गांधींवर गंभीर आरोप केले आहेत.दरम्यान, भाजपच्या प्रश्नांना उत्तर देताना काँग्रेस पक्षानं राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाविरुद्ध बोलले आहेत, अशा सहा घटनांची यादी जाहीर केली.काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सभापती धनखर यांनी सभागृहाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. यात आधीच्या सभापतींनी 1967 आणि 1983 च्या निर्णयांचा हवाला दिला होता. सदस्यांना आरोप करण्यास मनाई करण्यात आली होती.
काँग्रेस खासदार शक्तीसिंह गोहिल यांनी राज्यसभेतील सभागृह नेते पियुष गोयल यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली. त्यांनी गांधींचं नाव न घेता म्हटलं की, 'एका लोकसभा खासदारानं भारतीय संसद आणि घटनात्मक संस्थांची बदनामी केली आहे.'गोहिल यांनी आपल्या नोटिसीत म्हटलंय, मंत्री गोयल यांनी दोन दिवसांत आपल्या विधानाचा वारंवार पुनरुच्चार केला आहे. लोकसभेच्या सदस्याविषयी ते वारंवार बोलत आहेत. गोयल यांनी लोकसभेच्या सदस्यावर सत्यता नसताना टीका केली आणि हेतुपुरस्सर अवमानकारक टिप्पणी केलीये.
गोहिल यांनी 2015 मध्ये चीन आणि सियोलच्या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. तिथं पंतप्रधान मोदी म्हणाले, 'पूर्वी लोकांना भारतीय असण्याची लाज वाटायची, पण आता त्यांना देशाचं प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटतो'. त्यांनी कॅनडा, फ्रान्स, जपान आणि बर्लिनमध्ये केलेल्या वक्तव्याचाही संदर्भ दिला. जिथं ते देशातील भ्रष्टाचार आणि स्वच्छतेच्या अभावाबद्दल बोलले होते.