जळगाव : जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत महत्वाचं विधान केलंय. इथं एका लग्न सोहळ्यात मंत्री पाटील शाब्दिक टोलेबाजी करताना दिसले.राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुलाबराव पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात खटके उडाल्याचं पहायला मिळालं होतं. यानंतर पाटील यांनी पुन्हा अजित पवारांवर निशाणा साधलाय.पवारांसारखी कोणाचीही बुद्धी चालत नाही. त्यामुळं आम्ही त्यांना घाबरून असतो, अशा शब्दांत मंत्री पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार आणि अजित पवारांना टोला लगावला. गुलाबराव पाटील कधी कोणाची टोपी उडवतील याचा नेम नसतो. त्याचाच प्रत्यय जळगावमधल्या विवाह सोहळ्यात आला.
'त्यांच्या बुद्धीपुढं कोणाचेही चालत नाही'
वधूच्या घरचं आडनाव पवार होतं. हाच धागा पकडत गुलाबराव पाटील म्हणाले, पवारांसारखी कोणाचीही बुद्धी चालत नाही. त्यामुळं आम्ही त्यांना घाबरून असतो. ते सकाळी-सकाळी कधी शपथ घेतील आणि काय करून टाकतील याचा नेम नसतो. त्यांच्या बुद्धीपुढं कोणाचेही चालत नाही. त्यामुळं त्यांना नेहमी सोबत ठेवतो, असा चिमटाही गुलाबराव पाटलांनी काढला. आता गुलाबराव पाटलांच्या टीकेला अजित पवार काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.