'खान' कलाकारांचे चित्रपट रिलिज होण्यापूर्वीच वाद कसा होतो?

मुंबई:  बॉलीवूडचा भाईजान सलमान खान असो, किंग खान शाहरुख असो किंवा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान असो यासगळ्यांना त्यांचे चित्रपट प्रदर्शित करताना नेहमीच वादाला सामोरे जावे लागते असे दिसून आले आहे. यापूर्वीच्या त्यांच्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटांवरुन देशामध्ये वेगवेगळ्या कारणावरुन रंगलेल्या वादानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.आता बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याला जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला आहे. यापूर्वी देखील सलमान खानला एका चिठ्ठीतून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामध्ये त्याचे वडील सलीम खान यांचे देखील नाव होते. काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीनं कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिष्णोईची मुलाखत प्रसारित केली होती. यावेळी तर त्यानं सलमानला थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती.



सलमाननं आमच्या समाजाची माफी मागावी, त्यानं तर तसं केलं नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीनं कारवाई करुन असेही लॉरेन्सनं सांगितले होते. आता सलमानच्या घराभोवती मुंबई पोलिसांचा कडक पहारा आहे. त्याच्या जीवाला कोणताही धोका पोहचू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बॉलीवूडच्या प्रख्यात अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीनं अनेकांना मोठा धक्का बसला आहे. सलमाननं मीडियाशी बोलताना यापूर्वी आपण कोणत्याही लॉरेन्सला ओळखत नसल्याचे म्हटले होते.यासगळ्यात सोशल मीडियावर वेगळयाच चर्चेला उधाण आले आहे. नेटकरी आणि चाहते यांनी विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. दरवेळी कोणत्याही खान अभिनेत्याच्या चित्रपटाच्यावेळेस वाद कसा काय होतो, गेल्या वर्षी लॉरेन्सनं सलमानला पत्र पाठवलं होतं. त्यानंतर आता ते पुन्हा एकदा व्हायरल झाले आहे. पुढील महिन्यात २१ एप्रिलला सलमानचा किसी का भाई किसी की जान नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याच्या टीझरला, गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

आमिर, शाहरुखच्या चित्रपटावरुन झाला होता वाद....

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढाला नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. याचे कारण त्यानं त्याच्या एका मुलाखतीमध्ये देश सोडून जाण्याविषयी वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा आणि त्याच्या यापूर्वीच्या वक्तव्यावरुन देखील त्याला नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल केल्याचे दिसून आले. त्याचा फटका लाल सिंग चढ्ढाला बसला आणि प्रेक्षकांनी त्याच्या चित्रपटाकडे पाठ फिरवली होती. आमिरनं चाहत्यांची, नेटकऱ्यांची माफीही मागितली होती.

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या पठाणनं तर कहर केला होता. त्या चित्रपटातील दीपिकाच्या भगव्या बिकीनीतील गाणं व्हायरल झालं आणि नेटकऱ्यांचा संताप झाला. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये शाहरुखच्या चित्रपटावरुन निदर्शनं झाली, त्याचे पोस्टर जाळण्यात आले. थिएटरबाहेर आंदोलनंही झाली. मात्र यासगळ्याचा सकारात्मक परिणाम शाहरुखच्या पठाणवर दिसून आला. त्याच्या पठाणनं तब्बल एक हजार कोटींची कमाई केल्याचे दिसून आले.वादाचा परिणाम चित्रपटावर होतो त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कमाईचे आकडेही वाढतात हे आतापर्यतचे खान अभिनेत्यांच चित्रपट आणि त्यांनी केलेली कमाई यावरुन दिसून आले आहे. येत्या काळात सलमानचा किसी का भाई किसी की जान नावाचा चित्रपट प्रदर्शित होतो आहे त्या पार्श्वभूमीवर त्याला मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्या हा पुन्हा वेगळ्या प्रकारचा पब्लिसिटी स्टंट तर नाही ना असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने