कोल्हापूरचा राजकीय इतिहास; अनेक मातब्बरांनी अनुभवला पराभव

कोल्हापूर : ज्या मतदारांनी लोकप्रतिनिधींना मतदान केले, त्यांनाच गृहीत धरून संबंधितांनी काही निर्णय घेतला तर तो लोकांच्या पचनी पडत नाही, हा कोल्हापूरचा राजकीय इतिहास आहे.त्यातून जिल्ह्यातील अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. शिवसेनेत पडलेली फूट, त्यात जिल्ह्यातील आमदार, खासदारांनी घेतलेला निर्णय यावरून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काय होणार याविषयी उत्सुकता आहे.कोल्हापूर शहरातून १९९० मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर कै. दिलीप देसाई आमदार झाले; पण दोन वर्षांतच त्यांनी शिवसेना सोडली. त्यांच्या या निर्णयाविरोधात मोठे आंदोलन झाले. पुढच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी श्रीमती शिवानी देसाई काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरल्या. मात्र, त्यांचा पराभव झाला.

सलग तीनवेळा एकाच पक्षाच्या तिकिटावर वेगवेगळ्या मतदारसंघातून विजयी झालेल्या एका आमदारांनी अचानक पक्ष बदलला. पण, त्यांनाही लोकांनी नाकारले. मी एवढी विकासकामे केली म्हणून मी घेईल तो निर्णय लोकांनी मान्य करावा ही मानसिकता कोल्हापुरात चालत नसल्याची ही दोन ठळक उदाहरणे.२००९ च्या लोकसभा निवडणुकीतही हेच पाहायला मिळाले. वयोमानानुसार राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार असलेल्या कै. सदाशिवराव मंडलिक यांना पक्षाने उमेदवारी नाकारली; पण ते अपक्ष लढले आणि जिंकले.कै. मंडलिक यांना विश्‍वासात घेऊन उमेदवार ठरवला असता किंवा त्यांनाच पक्षाची उमदेवारी देऊन त्यावेळी पक्षाचे उमेदवार राहिलेल्या माजी खासदार संभाजीराजे यांना अपक्ष उतरवून बळ दिले असते तर कदाचित वेगळाही निकाल लागला असता.



कागलचे माजी आमदार संजय घाटगे सहावेळा वेगवेगळ्या पक्षातून लढले. मात्र, त्यांनाही लोकांनी स्वीकारले नाही.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरातून खासदार धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली, ते जिंकलेही; पण त्यानंतर राष्ट्रवादीसोबत असलेली त्यांची नाळ तुटली. पक्षाच्या व्यासपीठावरही त्यांचा वावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्यापुरताच राहिला.त्यांची जवळीक भाजपशी वाढली. २०१९ ला पक्षाने त्यांना उमदेवारी दिली. मात्र, पूर्वानुभव पाहता लोकांनी त्यांची उमेदवारी आवडली नाही आणि ते पराभूत झाले.कामाच्या, संपर्काच्या आणि यंत्रणेच्या पातळीवर प्रबळ असलेल्या आमदार सतेज पाटील यांनाही याच कारणाने २०१४ च्या निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागली.

प्रा. मंडलिक, मानेंविषयी उत्सुकता

वर्षभरावर लोकसभेची निवडणूक आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या चिन्हावर प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने खासदार झाले.पण जून २०२२ मध्ये झालेल्या सत्तांतरात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्‍वाखालील शिवसेनेची वाट धरली. माने यांना या निर्णयाविरोधातील कार्यकर्त्यांच्या रोषाला अलीकडेच सामोरे जावे लागले.प्रा. मंडलिक यांची पुढची भूमिका गुलदस्त्यात आहे. हे दोघेही पुढच्या निवडणुकीत भाजप किंवा शिवसेनेचे उमेदवार राहिले तर काय होईल याविषयी मोठी उत्सुकता आहे.आमदार प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनाही आपआपला गड राखताना कष्ट घ्यावे लागतील अशी स्थिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने