"मविआने एकजूट दाखवली तर 2024ला राज्यात सत्ता येईल"

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या कसबा आणि चिंचवड निवडणुकीचे वारे आता थंडावले आहे. कसबा पेठेत महाविकास आघाडीने भाजपचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. तर चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरल्यामुळे नाना काटे यांनी कलाटे यांची मते घेतली आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला. यावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकत्र राहिलो तर राज्यात सत्ता मिळवू असा विश्वास व्यक्त केला आहे.माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढलो तर कसब्याचा निकाल लागतो आणि थोड जर इकडं तिकडं झालं तर चिंचवडप्रमाणे निकाल लागतो. हा दोन्ही ठिकाणच्या मतदारांनी दिलेला धडा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत यांनी केलं आहे.



कसब्याचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी मार्गदर्शक असल्याचंही ते म्हणाले आहेत. तर 2024 पर्यंत महाविकास आघाडीने मजबुतीने एकत्रितपणे काम केलं तर विधानसभेत 200 पेक्षा जास्त जागा निवडून येतील. तसेच लोकसभेला 40 जागा निवडून येतील असा विश्वास संजय राऊतांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.तर चिंचवडमधील पराभवावर बोलताना राऊत म्हणाले की, "चिंचवडमध्ये आमच्याकडून काही बाबतीत चूक झाली. चिंचवडचा विजय हा भाजपचा विजय आहे, हे कोणीच मानणार नाही. चिंचवडमध्ये अनेक वर्षांपासून जगताप पॅटर्न चालतो आहे. हा विजयही जगताप पॅटर्नचा आहे. जर उमेदवार निवडताना अधिकची काळजी आम्ही घेतली असती किंवा राहुल कलाटेंनी माघार घेतली असती तर महाविकास आघाडीचा विजय निश्चित होता असंही राऊत पुढे म्हणाले आहेत.

तर मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काल झालेल्या हल्ल्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी मला त्याविषयी माहीत नसल्याचं यावेळी सांगितलं तर सर्व पक्षातील नेत्यांनी घोटाळा केला म्हणत मागे लागणारे भाजपचे नेते किरीट सोमय्यांच्या कार्यालयातच घोटाळा झाल्याचे उघड झाले असून यासंबधी दून जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे यावरतीही संजय राऊत यांनी काय बोलणार म्हणत हसून प्रतिक्रिया दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने