अवकाळी पाऊस, गारपीटीमुळं किती नुकसान झालंय? फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती

मुंबई: दोन दिवसांत राज्यातील विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळं आणि गारपीटीमुळं मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसानं झालं आहे. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं. यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत सविस्तर माहिती दिली आहे.फडणवीस म्हणाले, "अवकाळी पावसामुळं एकूण आठ जिल्ह्यांमध्ये साधारण १३,७२९ हेक्टर एवढं नुकसान झालं आहे. पालघरमध्ये विक्रमगड आणि जव्हार या भागात ७६० हेक्टरमध्ये आंबा आणि काजूचं नुकसान झालंय. नाशिकमध्ये कळवण, नाशिक, त्रंबकेश्वर, निफाड या भागांत २,६८५ हेक्टरवर गहू, भाजीपाला, द्राक्ष आणि आंब्याचं नुकसानं झालं आहे.धुळ्यात साखरी, शिनखेडा, शिरपूर ३१४४ हेक्टरचं नुकसानं झालं आहे. यामध्ये मका, गहू, हरभरा, ज्वारी, केळी, पपई याचं नुकसान झालं आहे. नंदुरबारमध्ये नंदुरबार, नवापूर, अक्कलकुव्वा, शहादा, तळोदा, अक्रानी इथं १,५७६ हेक्टरचं मका, गहू, हरभरा, ज्वारी, केळी, आंबा याचं नुकसान झालं आहे.



सर्वाधिक नुकसान अहमदनगर जिल्ह्यात!

जळगाव इथं भुसावळं, धरणगाव इथं २१४ हेक्टरवर गहू, मका, ज्वारी, केळी याचं नुकसानं झालं आहे. तर अहमदनगर जिल्ह्यांत राहुरी, नेवासा, अकोले, कोपरगाव इथं ४,१०० हेक्टरवर मका, गहू, कांदा, भाजीपाला याचं नुकसानं झालं आहे. तर बुलडाण्यात नांदुरा इथं ७७५ हेक्टरवर मका, गहू, कांदा, ज्वारी, हरभरा याचं नुकसान झालं आहे. वाशिममध्ये ४७५ हेक्टरवर चार तालुक्यांत गहू, हरभरा, फळपिकं असं एकूण १३,७२९ हेक्टरवर नुकसान झालेलं आहे.

तात्काळ मदतीचे आदेश

यासंदर्भात कालच रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रकारच्या मदतीचे आदेश दिले आहेत. आत्ता मिळालेल्या माहितीनुसार तात्काळ मदतीचे प्रस्ताव मागवले आहेत. या सर्व ठिकाणी तात्काळ मदत करण्यात येईल. त्यानंतर उर्वरित माहिती मिळाल्यानंतर दुपारनंतर पुन्हा सर्व निवेदन केलं जाईल, असंही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने