मुंबई महापालिकेबाबत मोठी अपडेट! हायकोर्टाचा ठाकरे गटाला दणका

मुंबई:  मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेला आव्हान देणारी ठाकरे गटानं दाखल केलेली याचिका मुंबई हयकोर्टानं फेटाळली आहे. हा ठाकरे गटाला मोठा झटका मानला जात आहे. हायकोर्टाच्या निर्णयानंतर आता प्रभागांची संख्या २२७ इतकीच कायम राहणार आहे. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती सुनील शुकरे, न्या. एम. डब्ल्यू. चंदवाणी यांच्या द्विसदस्यीय खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. याचिकेत काही तथ्य नसल्याची टिप्पणीही खंडपीठानं केली आहे.मविआ सरकारनं मुंबई महापालिकेतील 227 वॉर्ड संख्या वाढवून 236 करण्यात आली होती. हा नियम फक्त मुंबई महापालिकेसाठीच होता. कारण या महापालिकेसाठी वेगळा कायदा आहे. यानंतर शिंदे-फडणवीस सरकारनं ही रचना बदलून पूर्वीचीच २२७ वॉर्ड संख्या कायम ठेवली होती.



पण निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे राजू पेडणेकर यांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं. याप्रकरणाची दखल घेऊन प्रभाग संख्या आणि पुनर्रचनेसंदर्भातील सुनावणी 18 जानेवारी रोजीच पूर्ण झाली होती. त्यानंतर हायकोर्टानं आपला निर्णय राखून ठेवला होता.यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगानंही आपली भूमिका स्पष्ट केली असून आम्ही कुठल्याही अधिसूचनेला नव्हे तर कायद्याला बांधिल आहोत, असं राज्य निवडणूक आयोगानं म्हटलं होतं. राज्य सरकार जसे आदेश जारी करतं त्यानुसार आम्ही काम करतो, अशी भूमिका निवडणूक आयोगानं हायकोर्टात मांडली होती. 236 प्रभाग संख्येनुसार निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाली होती, मात्र तेव्हा त्यावर कुणीही आक्षेप घेतला नाही. रातोरात सरकार बदललं आणि एका निर्णयानं सारा प्रक्रिया रद्द केली असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने