राष्ट्रवादी होणार दिल्लीत बेघर? केंद्र सरकार देणार आणखी एक झटका

 दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय यां पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. या चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी धक्का बसण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीला दिल्लीत देण्यात आलेला बंगला काढून घेण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकारकडून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीआयला तशी नोटीस दिली जाऊ शकते. या दोन्ही राजकीय पक्षांना देण्यात आलेले सरकारी बंगले काढून घेण्याच्या हालचाली सुरु झाल्याची माहिती आहे.



राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीआय यांच्यासोबत तृणमूल काँग्रेस पक्षालाही दिल्लीत देण्यात आलेली जमीन परत द्यावी लागू शकते. दिल्लीत पक्षाचे कार्यालय बांधण्यासाठी तृणमूल काँग्रेसला जमीन देण्यात आली होती.तर राष्ट्रवादीकडून दिल्लीत पक्ष कार्यालयासाठी भूखंडाची मागणी करण्यात आली होती. राष्ट्रवादीकडून अनेक भूखंड पाहण्यात आले होते. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला पसंत न पडल्यामुळे पक्ष कार्यालय बांधण्यात आलेले नव्हते. तृणमूल काँग्रेस पक्षाला दिल्लीतील दिनदयाळ उपाध्याय मार्गावर १००८ स्क्वेअर मीटरचा भूखंड देण्यात आला होता. मात्र, आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्यामुळे हा भूखंड तृणमूलकडुन परत घेतली जाण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाचा मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे हा पक्ष केवळ प्रादेशिक पक्ष म्हणून कार्यरत राहणार आहे. किमान चार राज्यांमध्ये पक्षाचे अस्तित्व असणे गरजेचे आहे. या सगळ्या नियमांमधून राष्ट्रवादी अपात्र ठरला आहे. केवळ राष्ट्रवादी पक्षच नाही तर आणखी काही पक्षांवर देखील ही कारवाई केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने