प्रवेश परीक्षेतील गुणांवरच ॲडमिशन !

कोल्हापूर : विविध २६ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी शिवाजी विद्यापीठाकडून प्रवेश परीक्षा (इंट्रन्स एक्झाम) घेतली जाते. या परीक्षेतील गुणांवरच या वर्षीपासून विद्यार्थ्यांचे प्रवेश (ॲडमिशन) निश्‍चित करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या पी. जी. ॲडमिशन (पदव्युत्तर पदवी प्रवेश) विभागाने घेतला. त्यानुसार ५ ते ११ मे दरम्यान प्रवेश परीक्षा होणार आहेत.पदवी अभ्यासक्रमाचे ५० टक्के गुण आणि प्रवेश परीक्षेतील गुणांची टक्केवारी एकत्रित करून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येत होती. काही अभ्यासक्रमांमध्ये मुलाखतीचे गुणही होते. त्यानुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जात होती. मात्र, प्रवेश परीक्षेचे गुण प्राप्त व्हायचे आणि पदवी अभ्यासक्रमाचा निकाल काही कारणांनी लांबणीवर पडायचा. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला विलंब होऊन विद्यार्थी अन्य विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशित व्हायचे. ते लक्षात घेऊन या वर्षीपासून केवळ प्रवेश परीक्षेच्या गुणांवर ॲडमिशन होणार आहेत.



त्यासाठी संबंधित विद्यार्थ्याची आवश्‍यक शैक्षणिक पात्रता पूर्ण असणे आवश्‍यक आहे. या नव्या बदलानुसार एम. एस्सी. रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र, संख्याशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, गणित, सूक्ष्मजीवशास्त्र, बायोकेमिस्ट्री, मेडिकल इन्फॉरमेशन मॅनेजमेंट,पर्यावरणशास्त्र, फूड सायन्स, ॲग्रो केमिक्ल्स अँड पेस्ट मॅनेजमेंट, नॅनो सायन्स, एमसीए सायन्स, भूगोल, रशियन भाषा, एम. एम. मास कम्युनिकेशन, एम. टेक (रुरल टेक्नॉलॉजी), एमबीए (रुरल मॅनेजमेंट), एमएसडब्ल्यू, बी. जे., एम. जे., बी. लिब., बी. एस्सी. एम. एस्सी. इकॉनॉमिक्स इंटिग्रेटेड, एमबीए डिस्टन्स मोड या अभ्यासक्रमांना प्रवेश होतील. पदवी अभ्यासक्रमाच्या निकालांच्या विलंबाचा प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होऊ नये.

अन्य विद्यापीठांनुसार शिवाजी विद्यापीठातील प्रक्रियेचे स्वरूप रहावे यासाठी प्रवेश परीक्षेतील गुणांवर प्रवेश देण्याचा निर्णय अधिकार मंडळाच्या मान्यतेनुसार घेतला आहे. त्याची अंमलबजावणी या वर्षीपासून होईल. फॅक्टली चेंज परीक्षा गेल्यावर्षी रद्द केली आहे. -डॉ. एस. एस. महाजन, अध्यक्ष, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समिती शिवाजी विद्यापीठ कागदपत्रे ‘अपलोड’ करावी लागणार गेल्या वर्षीपर्यंत ऑनलाईन अर्ज करून त्यासोबत शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे हार्ड कॉपीच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना विद्यापीठात सादर करावी लागत होती.त्याचा त्रास कमी करण्यासाठी या वर्षीपासून संबंधित कागदपत्रे ऑनलाईन अर्जासमवेत विद्यार्थ्यांनी अपलोड करायची आहेत. प्रत्यक्ष प्रवेशावेळी त्यांनी मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावयाची आहेत. अर्ज करण्याची २० एप्रिलपर्यंत मुदत प्रवेश परीक्षा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध केंद्रांवर ऑफलाईन एमसीक्यू स्वरूपात घेतली जाते. यंदा या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत २० एप्रिलपर्यंत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने