मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील बिदर , हमनाबाद इथं एका सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला.राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी ओबीसींची मतं घेतात, पण त्यांना ताकद देत नाहीत. मोदीजी, तुम्ही दलित, आदिवासी आणि ओबीसींना त्यांचे हक्क देऊ शकत नसाल तर बाजूला व्हा. आम्ही त्यांना त्यांचे हक्क देऊन दाखवू, असं खुलं आव्हान त्यांनी मोदींना दिलंय.
राहुल गांधींनी 'जितनी आबादी उतना हक्क' या हॅशटॅगखाली ट्विट केलंय. त्यात त्यांनी लिहिलंय, काँग्रेसनं सर्व जनतेला त्यांचे हक्क मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय. 9 वर्षे झाली मोदीजींनी ओबीसींची मतं घेतली, पण त्यांनी ओबीसींसाठी काय केलं? जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले, आज आरएसएस आणि भाजपचे लोक लोकशाहीवर आक्रमण करत आहेत, हे दुःखद आहे. भाजप आणि आरएसएस बसवण्णा यांच्या समान भागीदारी, समान संधी या आदर्शांवर हल्ला करत आहेत. ते भारतात द्वेष आणि हिंसाचार पसरवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.