महाविकास आघाडीत बिघाडी? '...तर आमचा प्लॅन तयार', नाना पटोलेंचं सूचक वक्तव्य

मुंबई:  राज्यात मोठ्या घडामोडी सुरू असतानाच 2024मध्ये आघाडी म्हणून लढू की नाही हे आताच कसं सांगू? असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. शरद पवार यांचा हा इशारा कुणाला? असा सवालही केला जात होता. पवार यांच्या विधानावरून आघाडीत बिघाडी असल्याची चर्चाही रंगली होती. पण खुद्द शरद पवार यांनीच आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचं म्हटलं आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला.मात्र, ही चर्चा पुरती थांबलेली नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीत सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा आमचा मानस आहे. पण आघाडी नाही झाली तर आमचे पुढचे सर्व प्लॅन तयार आहेत, असं नाना पटोले म्हणाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.



काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'टीव्ही9' प्रतिक्रिया दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसचा दुसरा प्लॅन तयार असल्याचं सांगून महाविकास आघाडीला सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे पटोले यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यामधून अनेक तर्क वितर्क काढले जात आहेत.राज्यात अनेक ठिकाणी अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले आहेत. त्यावरही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री जनता ठरवते. आम्ही त्यावर भाष्य करणं योग्य नाही. जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आज निवडणुका नाहीत, त्यामुळे मुख्यमंत्रीदावर चर्चा करण्याचं कारण नाही. जेव्हा निवडणुका येतील तेव्हा चर्चा होईल. ज्या पक्षाचे आमदार सर्वाधिक निवडून येतील त्यांचाच मुख्यमंत्री होईल, असं नाना पटोले म्हणाले आहेत.महाराष्ट्रात चुकून लोकांनी भाजपला 105 आमदार दिले. महाराष्ट्रात कधी नव्हे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपचे आमदार निवडून देणं जनतेची चूक होती. संख्या बळाच्या आधारावर प्यादे चालवण्याचं काम भाजप करत आहे. मात्र हे अधिक काळ चालणार नाही, असंही पटोले यांनी सांगितलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने