"तात्काळ घरं उभी करा"; CM शिंदेंचे कलेक्टर अन् विभागीय आयुक्तांना 'ऑन दि स्पॉट' आदेश

पारनेर : अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याला मोठा फटका बसला आहे. यामध्ये वनकुटे गावातील काही आदिवासी कुटुंबांची घर उद्ध्वस्त झाल्यानं त्यांना रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. पण या बांधवांची घरं तात्काळ उभी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर 'ऑन दि स्पॉट' जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना दिले.



नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या पारनेर तालुक्यात आले आहेत. यावेळी त्यांनी वनकुटे गावाला भेट दिली. माध्यमांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी इथल्या पीक नुकसानीची आणि घर पडल्याचं वृत्त दाखवलं होतं. या वृत्ताची मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यादरम्यान दखल घेतली. तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींसमोरच जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना तातडीनं ज्या आदिवासी बांधवांची घर वादळी पावसामुळं उद्ध्वस्त झाली ती दुरुस्त करण्याचे आणि त्याचा तात्काळ अहवाल देण्याचे आदेश दिले. यामुळं पीडित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, राज्यातील विविध भागात अवकाळी पावसामुळं प्रचंड मोठ्या हेक्टरवर शेतीचं नुकसान झालं आहे. कालच मुख्यमंत्री नाशिकच्या दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच तातडीनं पंचनामे करण्याचे आदेशही सरकारी अधिकाऱ्यांना दिले होते.तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भाच्या दौऱ्यावर होते, त्यांनी देखील तिथं झालेल्या अवकाळी पावसाची पाहणी केली आणि पंचनामे करणार असल्याचं सांगितलं. विदर्भात अवकाळी पावसामुळं ७,४०० हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने