कोल्हापूर : "वाणिज्य शाखेची पदवी घेतली. कटलरीच्या दुकानात कामाला लागलो. सहा महिन्यांनंतर ते काम सोडले आणि गावाकडे परतलो. गावातून बाहेर पडताना टकाटक इस्त्रीची कपडे परिधान करून पुईखडीच्या टेकडीवर जात होतो.तेथे कपडे बदलून सेंट्रिंग कामाला जात होतो. ते काम कसेबसे पंधरा दिवस केले आणि गावातल्या टेलरकडे कपडे शिवण्याचे काम सुरू केले. हे काम शिकल्यानंतर दुकान टाकण्याचा विचार होता. तो सत्यात उतरला नाही.
टेम्पो-ट्रॅक्स खरेदी करून रंकाळा-भोगावती वडाप सुरू केले. त्यात स्पर्धा वाढल्याने तो व्यवसाय बंद करून पुढे शेतीत लक्ष घातले. शेतीत उत्पन्न वाढल्यानंतर पतसंस्थेत नोकरीला लागलो. त्यानंतर मात्र कायद्याची पदवी घ्यायचे ठरवले.वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी मुलगा सम्राटसोबत स्पेशल डिग्री घेतली. आज माझा वकील व्यवसाय उत्तमपणे सुरू आहे, ‘करवीर तालुक्यातील शेळकेवाडीचे युवराज आनंदा शेळके सांगत होते.’ एक, दोन नव्हे तर तब्बल तीस व्यवसायात अखेर त्यांनी स्वतःला आजमावत कायद्याची पदवी घेतली. या व्यवसायात त्यांचा चांगला जम बसला आहे. विशेष म्हणजे त्यांची मुलगी सम्राज्ञी हिनेही कायद्याची पदवी घेतली आहे.
श्री. शेळके यांनी आयुष्यातील चढउताराचा अनुभव घेत अखेर स्वतःला स्थिर केले आहे. वाणिज्य शाखेची पदवी मिळवल्यानंतर शिक्षणाचा विचार त्यांनी सोडला होता. त्यांनी लिहिलेल्या दोन कादंबऱ्या ते दाखवण्यासाठी प्राचार्य दिनकर पाटील यांच्याकडे गेले होते.त्या वाचून त्यांनी शेळके यांना कायद्याची पदवी घेण्याचा सल्ला दिला. मुलगा व मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपण आता कसे शिकायचे, असा क्षणभर विचार त्यांच्या मनात आला. मुलगीने बाबा, तुम्ही शिका हो, असे म्हटल्यानंतर त्यांनी थेट भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.मुलगा अकरावी विज्ञान शाखेत शिकत होता. त्याला वकील व्हायचे होते. बारावी कला शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने कायद्याचा अभ्यास सुरू केला. दोघांनी स्पेशल डिग्री एकाच वेळी घेतली. त्यांची मुलगी एलएलएम झाली आहे.
इंग्रजी व्याकरणावर लिहिले पुस्तक....
शेळके पतसंस्थेतील नोकरीत व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक झाले. पतसंस्थेला रामराम ठोकत ते मासिके, डायऱ्यांचे मार्केटिंग करू लागले. सहा महिने दुचाकीवरून त्यांनी हे काम केले. त्यातही अपेक्षेप्रमाणे त्यांना वेतन मिळाले नाही. गायी खरेदी करत त्यात त्यांनी हातपाय मारण्यास सुरुवात केली. ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर स्टडी मटेरियल विक्रीच्या व्यवसायात उतरले.या कामात एजंटांचा सुळसुळाट झाल्याने त्यांनी ते कामही सोडले. फायनान्स एजंट म्हणून चार पैसे कमावले. पुढे कर्ज देताना अनेक अडचणी येऊ लागल्याने भोगावतीतील कार्यालयाला त्यांनी टाळे ठोकले.मोबाईल शॉपीचा सहा महिने व्यवसाय केला.त्यांच्या शॉपीच्या परिसरात चार-पाच दुकाने थाटली गेली. प्रोजेक्टरवर शाळांत चित्रपट दाखविण्याचे टेंडर त्यांना मिळाले. दोन वर्षांत हा व्यवसाय सोडून त्यांनी थेट इंग्रजी व्याकरणावर आधारित ''आय कॅन स्पिक'' पुस्तक लिहिले.वकिली करणार म्हटल्यावर अनेकांना मी मध्येच कॉलेज सोडणार, असे वाटत होते. अभ्यासात स्वतःला झोकून देत पदवी घेतली. आज माझा वकिली व्यवसाय उत्तमपणे सुरू आहे.