मुंबई: ओटीटीचे प्रस्थ कितीही वाढले तरी मालिकांची जादू काही कमी झालेली नाही. आजही चांदया पासून बांदयापर्यंत घराघरात मालिका पाहत जातात. सध्या मराठीमध्ये पाच वाहिन्या आणि पंचवीस हून अधिक मालिका असल्याने कोणती मालिका 'टीआरपी'च्या रेस मध्ये सर्वात वर आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.गेली काही महीने 'स्टार प्रवाह' वाहिनी यामध्ये सर्वात पुढे आहे तर गेली काही दिवस याच वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' आणि 'आई कुठे काय करते' या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत बराच ववेळ बाजी मारली. पण गेले काही आठवडे चित्र पूर्ण बदलले आहे. अभिनेत्री जुई गडकरीची 'ठरलं तर मग' ही मालिका सलग पाचव्या आठवड्यात सर्वाधिक टीआरपी मिळवणारी मालिका ठरली आहे.
स्टार प्रवाह वरील जुई गडकरी हिच्या 'ठरलं तर मग' या मालिकेला सर्वाधिक टीआरपी म्हणजेच 6.8 रेटिंग मिळालं आहे. तर 'आई कुठे काय करते' ही मालिका दुसऱ्या स्थानावर असून या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे. तर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका 6.5 रेटिंग सह तिसऱ्या क्रमांकावर आहे.विशेष म्हणजे गेली काही महीने आघाडीवर असलेली 'रंग माझा वेगळा' ही मालिका मागे पडलेली असून चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.2 रेटिंग मिळाले आहे.
तर 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडली आहे. या मालिकेला 6.1 रेटिंग मिळाले आहे. त्या पाठोपाठ 'ठिपक्यांची रांगोळी', 'सहकुटुंब सहपरिवार', 'स्वाभिमान' , 'अबोली', 'लग्नाची बेडी' या मालिका पहिल्या दहा क्रमांकावर आहेत.विशेष म्हणजे पहिल्या दहा स्थानावर स्टार प्रवाह वाहिनीच्याच मालिका असल्याने ही वाहिनी यंदाही सर्वाधिक टीआरपी मिळवणारी वाहिनी ठरली आहे.