रोहित शर्मा नाही! टी-२० वर्ल्डकपसाठी ‘या’ खेळाडूला कर्णधारपद मिळावं, रवी शास्त्रीचं मोठं विधान, म्हणाले…

इंडिया : टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आगामी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाच्या कर्णधारपदाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शास्त्री यांच्या म्हणण्यानुसार, पुढील टी-२० वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हार्दिक पांड्याकडे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवावी. बीसीसीआयने याच मार्गाचा अवलंब केला पाहिजे. २००७ मध्ये झालेल्या पहिल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये महेंद्र सिंग धोनीकडे नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. तशाच प्रकारे भविष्यातही अशा निर्णयांची अमलबजावणी होणे गरजेचं आहे, असं रवी शास्त्री यांनी इएसपीएनच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं.



रवी शास्त्री म्हणाले, “कुणीही खेळण्यासाठी क्वालिफाय करू शकतो. पण मला वाटतं की हार्दिक संघाचं नेतृत्व करेल. पुढील दोन वर्ल्डकप (२०२३ वनडे वर्ल्डकपनंतर) टी-२० क्रिकेटचे आहेत. तो आधीपासूनच भारताचा कर्णधार (टी-२० मघ्ये स्टॅंडबाय) आहे. जर तो अनफिट नसेल, तर त्याचं काम करत राहील. अशातच मला वाटतं की, निवड समिती एका नव्या दिशेनं पावलं उचलतील. सध्याच्या घडीला युवा खेळाडूंमध्ये खूप टॅलेंट आहे. तुमच्याकडे नवीन संघ असू शकतो. नाहीतर काही नवीन चेहरे नक्कीच असतील. भारतासाठी शेवटचा टी-२० सामना खेळणारे खेळाडूही असतील. पण नवीन खेळाडूही संघात सामील होतील. कारण यंदाच्या आयपीएलमध्ये नवख्या खेळाडूंनी चमकदार कमगिरी केली आहे.”

शास्त्री पुढे म्हणाले, “मला असं वाटतंय की, ते २००७ च्या मार्गाने जातील. जिथे निवड समितीकडून टॅलेंटला प्राधान्य दिलं जाईल आणि निवडीच्या बाबतीत हार्दिककडे अनेक विकल्प असतील. कारण त्याचे विचार वेगळे असतील. त्याने एका फ्रॅंचायजीच्या कर्णधाराच्या रुपात आयपीएल खेळलं आहे आणि अनेक अन्य खेळाडूंना पाहिलं आहे. त्याच्याकडे त्याचे इनपूट असतील.”

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने