सावधान! बुधवारपासून पुन्हा तापमानवाढीचा इशारा

 नागपूर : राज्यात आणि विशेषत: विदर्भात तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या वर गेला असताना बुधवार, १७ मे पासून पुन्हा तापमानवाढीचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील तापमानात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत.


अवकाळी पावसानंतर राज्यातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे. राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भातील अकोला शहरात घेण्यात आली. तर उर्वरित शहरांमध्येदेखील हा पारा ४२ ते ४४च्या दरम्यान होता. सोमवारी तापमानात एक ते दोन अंशाची घट दिसून आली. त्यामुळे नागरिक सुटकेचा सुस्कारा सोडत असतानाच हवामान खात्याने हा तापमानवाढीचा इशारा दिला आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात १५ मे पासून खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता.त्यानुसार या दोन्ही विभागात ही लाट होतीच. आता त्यात पुन्हा एकदा तापमानवाढीचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. नागरिकांनी या कालावधीत काळजी घ्यावी. दुपारच्यावेळी घराबाहेर पडणे टाळावे, असेही सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने