मुंबईच्या पराभवाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा फेरबदल! कोहली, धवनचा संघ एमआय पलटणला देणार का धोबीपछाड? जाणून घ्या समीकरण

 मुंबई : आयपीएल २०२३च्या लीग स्टेजचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे आणि आतापर्यंत फक्त टेबल टॉपर गुजरात टायटन्स प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. बाकीचे तीन संघ पात्र ठरायचे असून या संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दुसरीकडे, मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याने ही प्लेऑफची शर्यत आणखीनच रंजक बनली आहे. लखनऊ सुपर जायंट्सने मुंबईचा ५ धावांनी पराभव करून पॉईंट्स टेबलमध्ये मोठी खळबळ उडवून दिली. यावेळच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद वगळता प्रत्येक संघ प्लेऑफसाठी पात्र होऊ शकतो. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत कोण पात्र होणार हे सांगता येणं कठीण आहे.

आता लखनऊमध्ये काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला त्याच्यामुळे त्यांच्या प्लेऑफच्या आशा काहीशा कमी झालेल्या आहेत, रोहितचा संघ पुढे पोहचणार की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जर मुंबईचा संघ शेवटचा सामना जिंकला तरी त्यांचे जास्तीत जास्त १४ गुणच होतील. अशा स्थितीत त्यांना इतर संघाच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. कारण, त्यांचा सरासरी नेट रनरेट हा -०.१२८ इतका असून आतापर्यंत १३ सामन्यात ६ पराभव आणि ७ विजय मिळवून ते १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. लखनऊ सुपर जायंट्सचे १३ सामन्यांत १५ गुण झाले असून त्यांचा नेट रनरेट हा +०.३०४ आहे. आयपीएल २०२३मध्ये गतविजेता गुजरातने १३ सामन्यांत १८ गुण मिळवत प्ले ऑफचे तिकीट पहिले मिळवण्याचा मन पटकावला आहे, त्या खालोखाल चेन्नई सुपर किंग्जचे १३ सामन्यांत १५ गुण मिळवत सध्या ते दुसऱ्या स्थानावर आहेत त्यांना केवळ एका विजयाची आवश्यकता आहे. म्हणजेच मुंबईच्या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्सच्या आशा अधिक पल्लवित झाल्या आहेत.


७ संघ ३ जागांसाठी लढत आहेत चला एक नजर टाकूया

तीन संघ अद्याप प्लेऑफसाठी पात्र ठरले नाहीत, ज्यासाठी ७ संघ लढत आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जपासून ते ८व्या क्रमांकाच्या पंजाब किंग्जपर्यंतचे कोणतेही तीन संघ पात्र ठरू शकतात. कसे? चला एक नझर टाकूया. चेन्नई सुपर किंग्जला प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात पराभूत करणे आवश्यक आहे. लखनऊला आपले स्थान अधिक पक्के करण्यासाठी त्यांच्या शेवटच्या साखळी टप्प्यातील सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करावे लागेल. असे झाल्यास केकेआरही प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल.

प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबई इंडियन्सला शेवटच्या साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादला चांगल्या धावगतीने पराभूत करावे लागेल. याचा अर्थ बंगळुरू आणि पंजाबने आपले शेवटचे दोन सामने जिंकून १६ गुण गाठले तर त्यांची धावगती मुंबईपेक्षा कमी असेल. दुसरीकडे, मुंबईसह पंजाब आणि बंगळुरूचेही १६ गुण झाले आणि दोघांची धावगती मुंबईपेक्षा चांगली असेल, तर मुंबई लखनऊ आणि चेन्नईचा शेवटच्या सामन्यात चेन्नईने गमावल्यानंतरच पात्र ठरू शकेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. यामुळे आरसीबी १६ गुणांवर पोहोचेल. विशेष म्हणजे, जर मुंबई आणि पंजाबचेही १६ गुण झाले तर आरसीबीला पात्र होण्यासाठी दोन्ही संघांपेक्षा चांगला रनरेट आवश्यक असेल. दुसरीकडे, चेन्नई आणि लखनऊने आपला शेवटचा सामना गमावल्यास, १६ गुणांसह तिन्ही संघ प्लेऑफसाठी पात्र होऊ शकतात.

राजस्थान रॉयल्सला १४ गुणांवर नेण्यासाठी पंजाब किंग्जविरुद्धचा शेवटचा सामना चांगल्या धावगतीने जिंकावा लागेल. त्यामुळे मुंबई शेवटचा सामना जिंकणार नाही, अशी आशा त्यांना करावी लागेल. दुसरीकडे, बंगळुरू, कोलकाता आणि पंजाब यापैकी एकही संघ १४ गुणांपर्यंत पोहोचू शकला नाही आणि असे झाल्यास त्यांचा धावगती राजस्थानपेक्षा कमी होईल, मगच राजस्थान प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करू शकेल. कोलकाता नाईट रायडर्सला १४ गुणांपर्यंत पोहोचण्यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागेल. यासह, हा सामना जर चांगल्या धावगतीने जिंकाला तर त्यांना १४ गुणांवर प्लेऑफमध्ये पात्र होण्याची संधी आहे, फक्त केकेआरची धावगती इतर सर्व संघांपेक्षा चांगली असावी.

पंजाब किंग्जला त्यांच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सला पराभूत करावे लागेल, त्यामुळे त्यांचे १६ गुण होतील. यासोबतच त्यांना धावगतीही सुधारावी लागणार आहे. कारण बंगळुरू आणि मुंबईचेही १६ गुण असतील आणि चेन्नई आणि लखनऊने शेवटचा सामना जिंकला तर या तीन संघांपैकी १६ गुणांसह चांगला रनरेट असलेला एकच संघ पात्र ठरू शकेल.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने