मान्सूनने धरला वेग, केरळनंतर या तारखेला महाराष्ट्रात बरसणार; हवामान खात्याकडून नवे अपडेट्स

नवी दिल्ली : मान्सून २०२३ संबंधी हवामान खात्याकडून आनंदाची बातमी समोर आली आहे. १९ मे पासून अंदमान आणि निकोबार बेटांवर अडकलेल्या नैऋत्य मान्सूनने अखेर वेग धरला आहे. १५ जूनपासून देशातल्या बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मान्सूनने २२ ते २६ मे या कालावधीत अंदमान आणि निकोबार बेटे ओलांडून पुढे बंगालच्या उपसागरात सरकायला हवे होते. पण हवामानातील बदलांमुळे याला विलंब झाला. पण अखेर आता मान्सून पुढे सरकला आहेत.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मान्सूनचा हा वेग पाहता केरळमध्ये आणि तामिळनाडूमध्ये १ जूनला तर ५ जूनपर्यंत कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्येत मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहू शकतो. १५ जूनपासून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस सुरू होईल. राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये २० जूनपासून पावसाला सुरुवात होईल तर मान्सूनचा हा टप्पा ८ जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.



७० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील….

मान्सूनच्या पुढे सरकण्यामुळे पुढील ५ दिवस संपूर्ण वायव्य भारतात ५०-७० किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. इतकंच नाहीतर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. विशेषतः राजस्थान, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. यादरम्यान, वायव्य भारतात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या खाली राहील. १ ते ३ जून दरम्यान बिहारसह गंगेच्या मैदानी भागात उष्णतेची लाट येऊ शकते.

खरंतर, मान्सून साधारणपणे १ जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होतो आणि जुलैच्या मध्यापर्यंत संपूर्ण देश व्यापतो. पण यंदा केरळमध्ये मान्सून सुरू होण्यास थोडा विलंब होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाऊस महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर कधी येईल, अशी प्रतीक्षा वाढत्या आर्द्रतेमुळे आणि त्यामुळे वाढणाऱ्या अस्वस्थतेमुळे मुंबईकरांना आहे. मात्र त्या आधी राज्यात मान्सूनपूर्व सरी येतील, असा अंदाज वर्तवल्याने उकाड्यापासून दिलासा कधी मिळेल, असा प्रश्न विचारला जात आहे. मुंबईत सध्या तापमानाचा पारा चढा नसला तरी आर्द्रता, अधूनमधून ढगाळ वातावरण यामुळे वातावरण त्रासदायक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने