आयआयटी-बी अभ्युदय टीमने केली पवई तलावाची स्वच्छता, ३ टन कचरा साफ

जगभरात आज ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा होत आहे. पर्यावरण दिनानिमित्त अनेक जागरुक नागरिक आपल्या परिसरातील स्वच्छता करतात. तर काहीजण या दिनानिमित्त आवर्जून एखादी स्वच्छता मोहीम राबतात. अशीच स्वच्छता मोहीम आयआयटी बॉम्बेच्या अभ्युदय टीमने राबवली होती. या मोहीमेअंतर्गत त्यांनी पवई तलावाची साफसफाई केली आहे.




‘स्वच्छ पर्यावरण, हरित पर्यावरण’ हा संदेश देत, आयआयटी-बॉम्बेच्या अभ्युदय टीमने रविवारी (ता.४) पवई तलावात स्वच्छता मोहीम राबवली. राज्यभरात ५ जूनपासून सुरू होणाऱ्या संपूर्ण पर्यावरण सप्ताहात विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. आयआयटी बॉम्बेच्या अभ्युदय टीमच्या सुमारे ४०० स्वयंसेवकांनी २ किमी लांबीच्या तलावाच्या परिसरात स्वच्छता करून तीन टन कचरा साफ केला.

“स्वच्छ, हिरवेगार आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी तलावाच्या किनार्‍याची स्वच्छता करण्याच्या उद्दिष्ट असून आयआयटी बॉम्बेच्या सर्वात सुंदर परिसरांपैकी एक असलेल्या तलावाची काळजी घेणे ही आमची जबाबदारी आहे,” असे टीम अभ्युदयने सांगितले. या प्रयत्नांना स्थानिक रहिवासी आणि आयआयटी प्राध्यापकांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेऊन पाठिंबा दिला. तर अनेकांनी अभ्युदय टीमच्या स्वच्छता मोहीमेचे कौतुक देखील केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने