कुलदीप-जडेजा या फिरकी जोडगोळीने जोडीने रचला इतिहास; एकदिवसीय क्रिकेटमध्ये केला ‘हा’ विश्वविक्रम

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बार्बाडोसच्या किंग्स्टन ओव्हलवर खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना १६३ चेंडू शिल्लक असताना पाच विकेट्सने जिंकला. टीम इंडियाचा वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मधला हा सलग ९वा विजय आहे. या सामन्यात कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या जोडीने इतिहास रचला. भारताच्या या स्टार फिरकी जोडगोळीने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर विश्वविक्रम केला आहे.




कुलदीप आणि जडेजाने इतिहास रचला

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या जोडीने १० पैकी ७ फलंदाजांना बाद करत तंबूत धाडले. कुलदीपने चार तर जडेजाने तीन विकेट्स घेत वेस्ट इंडीजचा सुपडा साफ केला. यासह, एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच, दोन डावखुरा फिरकीपटूंनी मिळून एका सामन्यात सात विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. या विश्वविक्रमाचा खुलासा खुद्द बीसीसीआयनेच केला आहे.

कदिवसीय क्रिकेटमधील भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची दुसरी सर्वात कमी धावसंख्या

भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या २३ षटकांत ११४ धावांत गारद झाला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी २०१८ मध्ये तिरुअनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजला अवघ्या १०४ धावांत ऑलआउट केले होते.

५ विकेट्स पडल्यानंतर दुसरा सर्वात मोठा विजय

टीम इंडियाने वेस्ट इंडिजकडून दिलेले ११५ धावांचे लक्ष्य २३व्या षटकात पाच विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पाच विकेट आणि तब्बल २७ षटके शिल्लक ठेवून जिंकणारी टीम इंडिया हा दुसराच संघ ठरला आहे. तसेच, टीम इंडियाचा हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. भारताने हा सामना १६३ चेंडू ठेवून जिंकला. यापूर्वी २०१३ मध्ये श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना १८० चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला होता.

इशान किशनने शानदार अर्धशतक केले

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ २३ षटकांत अवघ्या ११४ धावांत सर्वबाद झाला. भारताच्या फिरकीपटूंनी एकूण सात विकेट्स घेतल्या. यामध्ये कुलदीप यादवने चार आणि रवींद्र जडेजाने तीन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने इशान किशनच्या अर्धशतकाच्या जोरावर २२.५ षटकांत ५ गडी गमावून लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने