पोलिसांसमोरच DJ चा दणदणाट; गणेश मंडळांना पाठवणार नोटिसा, पोलिस अधीक्षक अॅक्शन मोडवर..

कोल्हापूर : राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीत पोलिसांसमोरच मोठ्या साउंड सिस्टीमचा दणदणाट झाला. त्याची दखल पोलिसांनी घेतली असून, संबंधित मंडळांच्या अध्यक्षांना कारवाईच्या नोटिसा पाठविण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठी साउंड सिस्टीम लावणाऱ्यांवरही कारवाईच्या सूचना दिल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी येथे दिली. शांतता समितीच्या बैठकीत सूचना देऊनही तसेच मोठी साउंड सिस्टीम लावणार नाही, अशी ग्वाही देऊनही मंडळांनी आपलेच खरे केले.




याबाबत अधीक्षक पंडित यांनी सांगितले की, राजारामपुरीतील मिरवणुकीत ४३ पैकी ३६ मंडळांनी सहभाग घेतला. बहुतांश मंडळांनी ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी दिसले आहे. प्रत्येक मंडळासमोरील सिस्टीमचे डेसिबल मोजले आहे. त्यांना नोटीस पाठविण्यात येणार आहे. त्यांनी साठ दिवसांत उत्तर द्यायचे आहे. त्यानंतर पुढील कारवाई सुरू होईल.

जिल्ह्यात ६० डेसिबलपेक्षा अधिक आवाज असलेल्या मंडळांनाही नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. ते म्हणाले, ‘‘पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह पथकाने राजारामपुरीतील संबंधित मंडळांच्या नोंदी घेतल्या आहेत. अशाच नोंदी ठिकठिकाणी पोलिस ठाण्यांकडून घेण्यात आल्या आहेत. एकूण किती जणांना नोटिसा जाणार, याची माहिती संकलित झालेली नाही; मात्र कायदेशीर सर्व प्रक्रिया करून त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत. यापूर्वीचे २२ गुन्हे दाखल आहेत. त्यांचीही कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

जबाबदारी पोलिसांचीच काय?

आगमन मिरवणुकीत ट्रॅक्टरसह अन्य वाहनांवर मोठमोठी रचना केल्या होत्या. काही ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरही डिझेल टाकीजवळ ठेवले होते. याचा मोठा धोका होता. तरीही प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली नाही. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी किंवा त्याचे मोजमाप करण्यासाठीही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी नव्हते. त्यामुळे कारवाई कोण करणार? सर्व जबाबदारी पोलिसांचीच काय, असाही प्रश्‍न उपस्थित झाला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने