शेतकऱ्यांनी एकत्र गूळ व्यवसाय करावा.

कोल्हापूर : लहान लागवड क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्रितपणे गूळ व्यवसाय करावा. ज्याप्रमाणे साखर निर्मितीच्या व्यवसायास एक उद्योग म्हणून पाहिला जातो, त्याप्रमाणे गूळ व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी संधी म्हणून पाहावे, असे आवाहन राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाकडून प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्रातर्फे उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक गुऱ्हाळगृहाची पाहणी करण्यात आली. या वेळी ते बोलत होते.



ते म्हणाले, ‘‘साखर तंत्रज्ञानाप्रमाणेच गूळ तंत्रज्ञानासारख्या विषयांचा अभ्यासक्रमही घेतला पाहिजे. त्यातून आधुनिक तंत्रज्ञानयुक्त गूळ निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळेल. ’’ दरम्यान, शिवाजी विद्यापीठाचे डॉ. पी. एस. पाटील यांनी विद्यापीठातील प्रयोगशाळा गूळ संशोधनासाठी देण्याबाबत सहकार्याची ग्वाही दिली.

कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. बी. जी. गायकवाड व डॉ. जी. बी. येनगे यांनी संशोधनविषयक कार्याचे सादरीकरण केले. विशेषज्ज्ञ डॉ. बी. टी. रासकर यांनी ऊस वाणाविषयी माहिती दिली. या वेळी प्रा. एस. महाजनी, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञानचे सल्लागार डॉ. ए. व्ही. सप्रे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. आर. आर. सूर्यवंशी, सदस्य सचिव प्रा. एन. जी. शहा, प्रा. ए. एम. गुरव, प्रा. जे. पी. जाधव, कार्यालय अधीक्षक डी. एस. पाटील, एम. आर. पांडव, ए. व्ही. पांडव, के. बी. गुरव, एस. यू. पाटील, ए. एस. जाधव व डी. एस. पाटील उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने