भारतीय संविधानाने प्रत्येक ग्राहकाला दिलेत हे महत्त्वाचे हक्क!

मुंबई: एखादी वस्तू विकत घेतल्यावर ती खराब निघाल्यास, किंवा विक्रेत्याने आपली फसवणूक केलीय असे लक्षात आल्यावर आपल्या मदतीला येतात ते आपले हक्क. कारण, ऑनलाईन बाजारपेठ असो किंवा ऑफलाईन प्रत्येकाला कधी ना कधी फसवणुकीचा सामना करावा लागला असेलच. त्याच फसवणूकीतून झालेल्या नुकसानाची भरपाई आपल्याला हे हक्क करून देतात.आज 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन आहे. भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती मग तो गरीब असो वा श्रीमंत तो एक ग्राहकही असतो. त्यामूळे भारतीय संविधानाने ग्राहकांना काही हक्क दिले आहेत. ते कोणते आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो हे पाहुयात.



सुरक्षेचा हक्क

वस्तू विकत घेण्यापूर्वी त्यांच्या गुणवत्तेबाबत तसंच त्या वस्तूवर मिळणाऱ्या सेवांबाबत आग्रही राहण्याचा ग्राहकाला पूर्ण अधिकार आहे. ग्राहकांनी शक्यतो आयएसआय आणि अॅगमार्कचं चिन्ह असलेल्या वस्तूच विकत घ्याव्यात. या वस्तूंच्या वापरामुळे शारीरिक किंवा आर्थिक नुकसान झालं तर कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागते.

माहिती मिळविण्याचा हक्क

या कायद्यानुसार ग्राहकाला उत्पादनाशी निगडित सर्व माहिती जसे की त्याची गुणवत्ता, प्रमाण, किंमत त्या मधील शुद्धता एक्स्पायरी डेट या सर्व बाबींची माहिती मिळविण्याचा हक्क आहे. सोनं खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासून घेण्याचा अधिकार आहे.

निवड करण्याचा हक्क

ग्राहकाला कोणत्या ही कंपनीच्या उत्पादनाला निवडण्याचा हक्क आहे. आज बाजारपेठेत अनेक कंपन्या आहेत. त्यावर ऑफर देखील सुरू असतात. आपण बाजार पेठेत गेल्यावर जर विक्रेता किंवा व्यावसायिक आपल्याला एकाच ब्रॅण्डची वस्तू घेण्याचा आग्रह करीत असेल तर आपण त्याच्या विरोधात तक्रार करू शकता.

मत मांडण्याचा हक्क

जर तुम्हाला वाटत असेल तुमची फसवणूक झाली आहे तर तुम्हाला तुमचं म्हणणं योग्य ठिकाणी मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. दुकानदार तूमचे ऐकत नसेल तर ग्राहक हक्क न्यायालयात तूम्हाला दाद मागता येते.

तक्रार आणि निवारण करण्याचा हक्क

उत्पादना विषयी असो,व्यवसायका विषयी असो, कंपनी विषयी असो ग्राहकाची फसगत झाली असेल तर या कायद्याच्या अंतर्गत ग्राहक आपली तक्रार करू शकतो आणि ग्राहक मंचाला किंवा ग्राहक निवारण केंद्राला त्याचे निराकरण करावे लागते.

ग्राहक हक्काच्या शिक्षणाचा हक्क

ग्राहकांनी आपले हक्क काय आहेत हे नेहमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी सरकार वेगवेगळे उपक्रम राबवत असतं, तसंच स्वयंसेवी संस्था शिबिरं किंवा कार्यशाळा घेत असतात.तसेच, वेगवेगळ्या जाहीरातीतूनही सरकार ग्राहकांना जागरूक करत असते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने